आयपीएलचे उर्वरित दोन्ही टप्पे भारतातच!
आयपीएल 7 स्पर्धेचा भारतातील हंगाम येत्या 2 मे पासून सुरू होणार आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संबंधित खात्याच्या अधिकार्यांशी चर्चा करून बीसीसीआयने एकूण 36 साखळी व बाद फेरीचे असे एकूण 40 सामने भारतात घेण्याचा निर्णय घेतला आहे.
गृहमंत्रालय आणि सुरक्षा व्यवस्था करण्याची हमी घेणार्या पोलिस यंत्रणेमुळेच आयपीएलचा दुसरा टप्पा भारतात आयोजित करणे शक्य झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
दुबई येथील 26 एप्रिल व 28 एप्रिल रोजी होणारे सामने अनुक्रमे कोलकाता व किंग्ज इलेव्हन पंजाब यांना स्वगृही होणारे सामने म्हणून बहाल करण्यात आले आहेत.बीसीसीआयचे हंगामी अध्यक्ष सुनील गावसकर म्हणाले, भारतीय क्रिकेट रसिकांना अधिकाधिक आयपीएल सामने पाहता यावेत, यासाठी हे निर्णय घेण्यात आले आहेत.
यंदाच्या आयपीएलमधील प्रत्येक फ्रँचायझीचा संघ भारतात एकूण 9 सामने खेळेल. 8 फ्रँचायझींपैकी किमान 5 फ्रँचायझींना किमान 4 सामने घरच्या मैदानावर खेळण्याची संधी मिळणार आहे. चेन्नई सुपरकिंग्ज आपले 2 सामने रांचीमध्ये खेळणार आहे. किंग्ज इलेव्हन पंजाब संघ आपले सामने कटक येथे खेळेल. राजस्थान रॉयल्सचे 4 सामने अहमदाबादला होतील. 1 मे, 16 मे व 17 मे रोजी सामने होणार नाहीत.