शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

गुलाबी शहराचा इतिहास

ND
गुलाबी नगरी जयपूर राजपूत राजा सवाई जयसिंह (द्वितीय) यांनी वसविले होते. हे शहर वसवितानाच त्यांनी त्याच्या सुरक्षिततेचा खूप विचार केला होता. हे शहर परकीय हल्ल्यापासून सुरक्षित रहावे यासाठी शहराला सात दरवाजे करून बाकीच्या शहराला बुरूजांच्या कोंदणात बसविले होते.

जयसिंहाना चिंता होती, ती विस्तारणार्‍या मराठी साम्राज्याची. म्हणूनच त्यांनी जयपूरला कडेकोट बंदोबस्तात ठेवले होते. पण एवढा विचार करून वसविलेल्या या शहराच्या सुरक्षिततेला कुणी नख लावेल याचा विचारही त्यांनी कधी केला नसेल. देशातील अनेक शहरे दहशतवाद्यांनी बॉम्बस्फोटांनी हादरवली. पण शांत समजणार्‍या जयपूरवर त्यांचा डोळा जाईल, याचा विचारही कधी कुणी केला नसेल.

गेल्या वर्षी ११ ऑक्टोबरला अजमेरच्या ख्वाजा मोईनुद्दीन चिश्तीच्या दर्ग्याजवळ बॉम्बस्फोट घडविण्यात आला होता. त्यात तीन जणांचा मृत्यू झाला होता. १७ जखमी झाले होते.

इतिहासात डोकवायचे झाल्यास जयपूर हे देशातील पहिले सुनियोजित शहर होते. तत्कालीन राजे जयसिंह यांनी त्यावेळची राजधानी आमेरमध्ये वाढत असलेली लोकसंख्या आणि पाण्याच्या प्रश्नाचा विचार करून नवे शहर उभारण्याचे ठरविले होते. त्यानंतर मग १७२७ मध्ये हे शहर बांधायला सुरवात झाली. प्रमुख स्थळे तयार होण्यास चार वर्षे लागली. हे शहर नऊ भागात विभागलेले आहे. दोन भागात राजकीय इमारती व राजवाडे आहेत. शिल्पशास्त्राच्या आधाराने हे शहर वसविण्यासाठी एका बंगाली ब्राह्मणाने मदत केली होती.

पूर्वी हे शहर गुलाबी नव्हते. इतर शहरांसारखेच होते. पण १८५३ मध्ये वेल्सचा राजपुत्र येथे आला तेव्हा संपूर्ण शहराला गुलाबी रंग देण्यात आला. त्यामुळे हे शहर लक्षात राहिले गेले. पुढे जयपूरला गुलाबी शहर हा पर्यायवाची शब्द बनला.

दोनशे वर्ग किलोमीटर क्षेत्रफळात हे शहर पसरले आहेत. त्यात जलमहल, जंतर-मंतर, आमेर महल, नाहरगड, हवामहल व आमेरचा किल्ला हे राजपुतांच्या वास्तुशास्त्राचे उत्तम नमुने आहेत.