शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. आज-काल
  4. »
  5. मंथन
Written By वेबदुनिया|

विश्वविक्रमी भटकंती अखेरच्या टप्प्यात

महेश जोशी

औरंगाबाद - एक व्यक्ती, एक स्कूटर, सव्वा दोन लाख किलोमीटरचा प्रवास, पावणे दोन लाख खेड्यांना भेटी, सात कोटी लोकांशी संवाद..... राष्ट्रीय एकात्मतेसाठी १३ वर्षांपासून भारतभ्रमण करणार्‍या परभणीच्या अन्वर अली खान यांच्या फिरस्तीचा हा बायोडाटा. गिनीज आणि लिम्का बुकने गौरविलेल्या या भटकंतीचा अंतिम टप्पा आता जवळ आला असून १५ ऑगस्ट रोजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या उपस्थितीत त्याचा समारोप होईल..

  ६३ वर्षे वयाचे अन्वर अली खान परभणीत स्थायिक झाले. अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारत भ्रमण यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ मार्च १९९५ रोजी या यात्रेला सुरूवात झाली.      
अन्वर खान नुकतेच औरंगाबादहून बीडमार्गे कर्नाटकात रवाना झाले. यावेळी एका हॉटेलमध्ये त्यांच्याशी संवाद साधला. रणरणत्या उन्हात प्रवास केल्यामुळे त्यांचा चेहरा कोरडा पडला होता. आवाजही काहीसा बसला होता. हाच धागा धरून खान म्हणाले, भारत भ्रमण केले. पण महाराष्ट्रात सर्वाधिक प्रदूषण पहायला मिळाले. त्याचे कारणही तसेच आहे. येथे घराघरात दुचाकी गाड्या आहेत. गाड्या अधिक असल्याने इंधन अधिक लागते. त्यामुळे पेट्रोल भेसळीचे प्रमाणही कमालीचे वाढले आहे. अगदी बिहारपेक्षा अधिक इंधन भेसळ राज्यात आहे. भेसळयुक्त इंधनामुळे प्रदूषणही वाढते. त्याचाच परिणाम आरोग्यावर होत असल्याचे त्यांनी सांगितले.

भारतात सर्वाधिक भ्रष्टाचार शिक्षण क्षेत्रात असल्याचा दावा ते करतात. सर्व शिक्षण अभियानासाठी शासन कोट्यवधी रूपये खर्च करत असताना हा पैसा कारणी लागत नसल्याबद्दन खान यांनी खंत व्यक्त केली आहे. आजघडीला सहावी सातवीचा विद्यार्थी स्वतःचे नावही लिहू शकत नाही. ७० टक्के शाळा अनुदानासाठी कागदोपत्री बोगस विद्यार्थी संख्या दाखवितात. उर्दू व आश्रमशाळा तर भ्रष्टाचाराचे अड्डेच बनल्याचे या प्रवासातून जाणवले असे ते सांगतात. विविध शिक्षण संस्थाचे संचालक त्यांच्या निकटवर्तीयांना तसेच कुटुंबीयांना नोकर्‍या देण्यासाठीच स्थापन करण्यात आल्या की काय असा प्रश्न पडावा इतपत परिस्थिती खालावली आहे, अशी टीका त्यांनी केली. धर्मादाय आयुक्त कार्यालयही भ्रष्टाचारात आघाडीवर असल्याचा आरोप त्यांनी केला.

  २००५ साली लिम्का बुकने तर २००६ साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डने त्यांच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला आहे. १३ वर्षांच्या प्रवासात त्यांनी एक लाख ७.६ गावांना भेटी दिल्या आहेत.      
मूळचे औरंगाबादचे असणारे ६३ वर्षे वयाचे अन्वर अली खान परभणीत स्थायिक झाले. अयोध्येत बाबरी मशीद पाडल्यानंतर त्यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी भारत भ्रमण यात्रा काढण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार १३ मार्च १९९५ रोजी या यात्रेला सुरूवात झाली. केवळ १८६ रूपये खिशात घेऊन यात्रेला सुरूवात केली. या दरम्यान अनेक मोठ्या कंपन्यांनी प्रायोजकत्व देऊ केले. मात्र ते नाकारुन ही यात्रा अखंडपणे सुरू ठेवली. शाळा, कॉलेज व धर्मशाळेत रात्री काढल्या. ज्या गावात गेलो त्यांची संस्कृती जाणून घेण्याचा प्रयत्न केला. या जोरावर ‘ऑखो देखा भारत’ हे पुस्तक लिहायला घेतले. त्याची तीन हजार पाने पूर्ण झाली आहेत. १५ ऑगस्ट २००८ रोजी अन्वर खान यांच्या यात्रेचा नवी दिल्लीत समारोप होणार आहे. याप्रसंगी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन केले जाणार आहे.

राजकारणी मंडळी विकासाभिमुख राजकारण करण्याएवजी धर्माच्या नावावर देशाला अधोगतीकडे नेत असल्याचा आरोपही अन्वर खान यांनी केला. वाढती महागाई, बेरोजगारी व स्वच्छ पिण्याचे पाणी हेच आजघडीला देशासमोरचे मूलभूत प्रश्न आहेत. मंदिर, मशिदीच्या वादाशी सर्वसामान्य नागरिकांना काही एक घेणे देणे नाही. अतिथी सत्कार, दया, प्रेम, माणूसकी ही मूल्ये अजूनही संपलेली नाहीत असे मत खान यांनी व्यक्त केले.

सामान्य माणूस जातीयवादी नाही असा दावा त्यांनी केला. त्यांच्या प्रवासाची नोंद जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे. २००५ साली लिम्का बुकने तर २००६ साली गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकार्डने त्यांच्या नावावर विश्वविक्रम नोंदविला आहे. १३ वर्षांच्या प्रवासात त्यांनी एक लाख ७.६ गावांना भेटी दिल्या आहेत. २ लाख २७ हजार किलोमीटरचा प्रवास केला. २७ हजार शाळा महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी व सात कोटी नागरिकांशी संवाद साधला. तब्बल २८ हजार घरांचा पाहुणचार स्वीकारला. सूर्योदय ते सूर्यास्त अशी तब्बल १३ वर्षे सुरू असलेला हा प्रवास आता अखेरच्या टप्प्यात असून यामुळे भारताला जवळून अनूभवता आले, असे अन्वर अली खान म्हणाले.