शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. मराठी सिनेमा
  3. नाट्य-चित्र-समीक्षा
Written By
Last Modified: शुक्रवार, 26 डिसेंबर 2014 (15:10 IST)

अवताराची गोष्ट : चित्रपट परीक्षण

चित्रपट : अवताराची गोष्ट
निर्माता : सचिन साळुंके
दिग्दर्शक : नितीन दीक्षित
सं‍गीत : गंधार
कथा-पटकथालेखक : नितीन दीक्षित
कलाकार : आदिनाथ कोठारे, मिहिरेश जोशी, यश कुलकर्णी, सुलभा देशपांडे, लीना भागवत, सुनील अभ्यंकर, रश्मी खेडेकर. 
अवतार धारण करणारी माणसे इतरांपेक्षा वेगळी आणि असामान्य म्हणविली जातात. त्याच धाटणीचा या चित्रपटाचा नायक आहे. या चित्रपटाची कथा फिरते ती लहान मुलांच्या भावविश्वाभोवती. त्यांच्या कल्पनाविष्काराभोवती. रूपेरी पडद्यावर पदार्पण करणारा मिहिरेश जोशी (व्यक्तिरेखेचं नाव कौस्तुभ) आणि य़श कुलकर्णी (व्यक्तिरेखेचे नाव मंग्या). ती दशावतारमयी जगातील कल्पनाविश्वात सुरस चमत्कारिक अन् साहसी जगात रममाण झालेले हे दोन चिमुरडे आणि त्यांच्या भावविश्वाची ही कथा आहे. 
 
आजच्या काळातील लहान, अल्लड मुलामुलींवर घरच्यांपेक्षा आजूबाजूची तरुणाई यांना पाहून, त्यांचे वागणे-बोलणे पाहून काही नकळतपणे संस्कार होत असतात. ते चांगले झाले तर या वयातील मुलामुलींच्या जडणघडणीवर त्याचा खोलवर चांगला परिणाम घडू शकतो. आज अवतार म्हटलं की सगळे त्या अवतार झालेल्या माणसासमोर हात जोडून उभे राहतील, अशी परिस्थिती झाली आहे. आपण माणूस आहोत आणि देव संकल्पनेमुळे माणूस असल्याचा आपल्यात न्यूनगंड निर्माण झाला आहे, अशी नेमकी परिस्थिती आपल्या अवतीभवती दिसून येते. आधुनिक भोंदूगिरी बोकाळत चाललेली दिसते. या आधुनिक भोंदूगिरीवर भाष्य करण्याचा सूक्ष्म प्रयत्न 'अवताराची गोष्ट' या चित्रपटाद्वारे केला आहे. 
इथल्या प्रत्येक कलावंताने चित्रपटाला चार चाँद लागेल, असं परफॉर्मन्सचे नाणे खणखणीतपणे या चित्रपटात वाजवले आहे. या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आदिनाथ कोठारे, सुलभा देशपांडे, सुनील अभ्यंकर, लीना भागवत आणि रश्मी खेडेकर आपल्याला दिसतील, एका विशेष भूमिकेत प्रतिभावंत कलाकार आशिष विद्यार्थी आपल्याला झळकताना दिसेल. सिनेमाच्या शेवटी सगळ्यांना धूळ चारत हिरो जिंकतो असं बघायला प्रेक्षकांना नेहमीच आवडतं. त्यामुळे सिनेमाच्या जगात हिरो हा नेहमीच मसिहा असतो. असाच आशय असणारा 'अवताराची गोष्ट' हा नवीन सिनेमा आहे.
 
या चित्रपटाचे लेखन, दिग्दर्शन, कथा, पटकथा व संवादांची धुरा सांभाळलेली आहे नितीन दीक्षितने. निर्मितीची जबाबदारी सचिन साळुंखेने उचलली आहे. सिनेमॅटोग्राफी नागराज दिवाकर असून मयूर हरदासने संकलक म्हणून तर गंधारने संगीत दिले असून शान आणि जसराज यांच्या सुमधुर आवाजातील ही गाणी श्रवणीय झालेली आहेत.
 
मुळातले कथा-पटकथालेखक असलेले नितीन दीक्षित यांनी 'अवताराची गोष्ट' हा मराठी चित्रपट तयार केला असून नव्या, अस्फुट विषयाला तो स्पर्श करणारा आहे, असे म्हणायला हरकत नाही. 
 
या चित्रपटाला ५१ व्या राज्य मराठी पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपट, संवाद व दिग्दर्शन अशा तीन पुरस्कारांनी गौरवण्यात आलं आहे.
 
रेटिंग : 3.5