शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. लाईफस्टाईल
  2. »
  3. वेबदुनिया विशेष 07
  4. »
  5. स्वातंत्र्य दिन
Written By अभिनय कुलकर्णी|

विज्ञान तंत्रज्ञानातील `परम` प्रगती

NDND
स्वातंत्र्याच्या साठ वर्षांत भारताने विज्ञान-तंत्रज्ञान आणि अवकाश क्षेत्रात प्रगतीची मोठी झेप घेतली आहे. सॉफ्टवेअर क्षेत्रात तर भारताचा दबदबा आहे. शिवाय स्वतंत्र उपग्रह तयार करून ते सोडण्यापर्यंतचे तंत्रज्ञान देशाने विकसित केले आहे. या प्रगतीचा हा आढावा.

इंडियन रिमोट सेन्सिंग अर्थात आयआरएसच्या माध्यमातून उपग्रहामार्फत शेती, पाणी, जमिनीचा वापर यासह विविध बाबींविषयी माहिती मिळू शकते. हे तंत्रज्ञान भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केले आहे.

इन्सॅट म्हणजे इंडियन नॅशनल सॅटेलाईट सिस्टिम म्हणजे भारताच्या प्रगतीची झलक आहे. या मालिकेंतर्गत इन्सॅट-2ई, इन्सॅट3ए, इन्सॅट-3बी, इन्सॅट-3सी, इन्सॅट-3ई, कल्पना-1 (मेटॅसट), जीसॅट-2, एज्युसॅट (जीसॅट-3) आणि अन्सॅट-4ए. हे उपग्रह भारतातर्फे अवकाशात सोडण्यात आले आहेत. भारतातील दूरचित्रवाणी आणि संपर्कसाधनांची गरज भागविण्यासाठी इन्सॅट उपग्रह ट्रान्सपॉंडर पुरवतात.

WDWD
भारतीय अवकाश संशोधन संस्थेतर्फे इंडियन सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (एसएलव्ही) प्रकल्प 1970 मध्ये सुरू करण्यात आला. त्यावेळी या प्रकल्पाचे प्रमुख होते डॉ. ए. पी. जे. अब्दूल कलाम. या प्रकल्पांतर्गत पहिले एसएलव्ही श्रीहरीकोटा येथे दहा ऑगस्ट 1979 मध्ये लॉंच करण्यात आले.

हे व्हेईकल लॉंच झाल्यानंतर भारत अशी क्षमता असणाऱ्या मोजक्या देशांच्या पंक्तीत जाऊन बसला. यानंतर प्रगत होत गेलेल्या तंत्रज्ञानानिशी यातही प्रगती होत गेली. एसएलव्हीनंतर आगमेंटेड सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (एएसएलव्ही) आले. त्यानंतर पोलर सॅटेलाईट लॉंच व्हेईकल (पीएसएलव्ही) आले आणि आता नुकतेच जीओसिंक्रोनाईजस सॅटेलाईट लॉंच व्हेईकल जीएसएलव्ही आले.

अवकाश संशोधनात आणि तंत्रज्ञानात भारत आता आघाडीचा देश आहे. लॉंच व्हेईकल टेक्नॉलॉजी ते उपग्रहांची रचना, ते तयार करणे, त्याचा वापर या सर्व क्षेत्रात भारताने प्रावीण्य मिळविले आहे. संपर्क, प्रसारण, हवामान, आपत्कालीन व्यवस्थापन, टेलिमेडिसीन या क्षेत्रात भारताने उपग्रहांचा नेमका वापर केला आहे.

आता भारताने या क्षेत्रात पुढचे पाऊल टाकताना पुढच्या वर्षापर्यंत चांद्रयान तयार करून ते अवकाशात पाठविण्याचे ठरविले आहे. त्यानंतर 2015 पर्यंत मानवरहित यान मंगळवार पाठविण्यात येणार आहे. रशियाने क्रायोजनिक इंजिन देण्याचे नाकारल्यानंतर भारताने तेही स्वतःच्या बळावर तयार करून दाखविले. त्यामुळे भारतीयांना अशक्य बाब कोणतीच नाही हेच यातून सिद्ध होते.

NDND
संगणक क्षेत्रातही भारताने दबदबा निर्माण केला आहे. अमेरिकेने महासंगणक देण्याचे नाकारल्यानंतर भारतात सीडॅक या संस्थेने महासंगणकांची परम मालिका तयार करण्यात आली आणि अमेरिकेला भारताची बौद्धिक ताकद दाखवून दिली. डॉ. विजय भटकर यांनी यांच्या नेतृत्वाखाली या संगणकाची निर्मिती करण्यात आली. त्यावेळी अशक्य वाटणारे हा काम यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आले. सध्या या मालिकेतील परम पद्म संगणक तयार करण्यात आला आहे. याव्यतिरिक्त परम 10000 आणि परम 9000 हे महासंगणक आहेत. परम 10000 हा हवामानाचा अंदाज, रिमोट सेन्सिंग, ड्रग डिझाईन आदी कामे करतो.