शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 2 ऑगस्ट 2021 (17:54 IST)

मृत्यूनंतर प्रेम विवाहाची इच्छा केली पूर्ण

एकमेकांवर प्रेम केलं पण बोलण्याचे धाडस न झाल्यामुळे दोघांनीही गळफास घेऊन आत्महत्या केली आणि जेव्हा घरच्यांना याची कल्पना आली तेव्हा दोन्ही कुटुंबीयांनी या दोघांच्या प्रेमाला संमती देत अंत्यविधी करण्यापूर्वी दोघांचे लग्न लावून त्यांच्या आत्म्याची शांती केली.
 
हा धक्कादायक प्रकार भडगाव जिल्हा जळगाव येथे घडला. मुकेश कैलाश सोनवणे वय वर्षे 22 राहणारे वाडे आणि नेहा बापूराव ठाकरे वय वर्षे 19 या मृतक असलेल्या प्रेमी युगुलांची नावे आहेत. या दोघांचे काही दिवसापासून प्रेमसंबंध होते. या दरम्यान मुकेशला बघण्यासाठी मुलीवाले येणार होते.आपले लग्न होणार नाही असा विचार करून त्यांनी रविवारी सकाळी एका माध्यमिक शाळेत जाऊन गळफास घेऊन आत्महत्या केली. हे कळतातच तात्काळ पोलिसांना कळविण्यात आले. दोघांचे मृतदेह बघून कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. त्यांच्या दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. या पूर्वी त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या प्रेमाला मान्य करून दोघांचे लग्न लावून दिले.
त्यांचे एकमेकांवर प्रेम आहे हे आम्हाला माहितीच नव्हते असं त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. या घटनेमुळे सम्पूर्ण गाव हादरून गेले आहे.
 
या घटनेबाबत मिळालेली माहितीनुसार नेहा व तिचे कुटुंबीय गेल्या काही महिन्यांपासून वाडे या मामाच्या गावी वास्तव्यास आले होते. येथे तिची ओळख मुकेश याच्याशी झाली. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले. त्यानंतर मुकेश व नेहा यांच्यात प्रेमसंबंध जुळले. दोघेही अनेकदा बाहेर फिरण्याच्या निमित्ताने भेटायचे. मात्र, बोलण्याचे धाडस न झाल्यामुळे नेहाच्या कुटुंबीयांनी तिच्या लग्नासाठी वर संशोधन सुरू झाले. तसेच मुकेशच्या कुटुंबीयांकडूनही मंगळवारी लग्नाची बोलणी होणार होती. त्यामुळे आता आपला प्रेमविवाह होणार नाही हे स्पष्ट झाल्याने मुकेश व नेहा या दोघांनी वाडे येथे नव्याने उभारण्यात आलेल्या माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील जिन्यात लोखंडी सळईला दोरी बांधून रविवारी (१ ऑगस्ट) पहाटे ३ ते ५ वाजेदरम्यान आत्महत्या केली.
 
मुकेशचे शिक्षण बारावीपर्यंत झाले होते. त्यानंतर तो शेती करायचा. नेहाही शेतात जात असे. दोघांच्या कुटुंबाची स्थिती जेमतेम आहे. मुकेशच्या पश्चात आई-वडील, भाऊ, तर नेहाच्या पश्चात आई-वडील, लहान बहीण व भाऊ आहे.
 
मुकेशने आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉट‌्सअॅप स्टेटसवर ‘बाय’ असा मेसेजही ठेवला होता. त्यानंतर पहाटे त्याने आत्महत्या केल्याचे समोर आले. घटनास्थळी चिठ्ठी व इतर काहीही आढळून आले नाही, असे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, याप्रकरणाचा सर्व बाजुंनी तपास केला जात असल्याचे सांगितले जात आहे.
 
पोस्टमार्टमनंतर दोघांचे मृतदेह वाडे गावात आणण्यात आले. त्यानंतर दोघांची एकाच वेळी अंत्ययात्रा निघाली. स्मशानभूमीत एकाच वेळी अंत्यविधी करण्यात आले. दोघांची लग्नाची इच्छा अपूर्ण राहिल्यानंतर मृत्यूनंतर स्मशानभूमीत दोघांचे विधिवत लग्न लावून देण्यात आले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी यांनी दिली. या घटनेमुळे सम्पूर्ण गाव हादरून गेले आहे.
file photo