आता महिलांचा मोर्चा कोल्हापूरकडे!
शनैश्वर देवस्थानमध्ये चौथर्यावर प्रवेश मिळाल्यानंतर आंदोलक महिलांनी आपला मोर्चा कोल्हापूरकडे वळविला आहे. महालक्ष्मी मंदिरातील गाभार्यात प्रवेश मिळावा याकरता १३ एप्रिलपासून लढा देणार असल्याचे भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष तृप्ती देसाई यांनी नमूद केले.
मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर शनैश्वर देवस्थानच्या विश्वस्तांनी गुढीपाडव्याच्या दिवशी शनी चौथरा महिलांसाठी खुला करून दिल्याने सर्व महिलांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. तृप्ती देसाई आणि आंदोलक महिलांनी चौथर्यावर जाऊन शनीच्या शिळेचे दर्शन घेतले.
यावेळी बोलताना देसाई म्हणाल्या, शनि चौथ-यावर प्रवेश मिळणे ही फक्त सुरूवात आहे. आम्ही तीन महिन्यांपूर्वी संघर्ष सुरू केला आणि महिला शक्तीचा विजय झाला. महालक्ष्मी मंदिराच्या गाभार्यात प्रवेश मिळावा म्हणून १३ एप्रिलपासून आंदोलन करणार आहोत. ज्या ज्या मंदिरात महिलांना केवळ महिला आहेत म्हणून प्रवेश नाकारला जाईल, तेथे आमचा लढा सुरूच राहील असे त्यांनी स्पष्ट केले.