शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. मराठी बातम्या
  3. महाराष्ट्र माझा
Written By wd|
Last Updated :भिवंडी , गुरूवार, 3 जुलै 2014 (14:23 IST)

मुंबईचा पाऊस आणि अपघात!

खारेगाव टोल नाक्यालगत हायवे-दिवा गावच्या हद्दीतील खाडीवरील ब्रिजवर बुधवारी पहाटे भरधाव स्विफ्ट कार कंटेनरवर धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात ३ जण जागीच ठार, तर एकजण गंभीररीत्या जखमी झाल्याची घटना घडली. या अपघातातील जखमीवर मुलुंड येथील व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. 
 
अजय अम्मद पिंटू (३४, रा. पवारनगर, ठाणे), कबीर हरविंदरसिंग अरोरा (२२, रा. मानपाडा, ठाणे), अनुज नितीन दिघे (२४, रा. घाटकोपर) असे अपघातात ठार झालेल्या तिघांची नावे आहेत. तर चालक अजित परशुराम परब (३३, रा. पवारनगर, ठाणे) हा गंभीर जखमी झाला आहे. त्याला प्रथम कळवा येथील छत्रपती शिवाजी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती गंभीर झाल्यामुळे त्यास मुलुंड येथील व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी हलवण्यात आले आहे. स्विफ्ट कारने हे चौघे पहाटेच्या सुमारास ठाणे येथील घरी परतत असताना भिवंडी-नाशिक महामार्गावरील खारेगाव टोल नाक्यालगतच्या खाडीवरील ब्रिजवर समोरील कंटेनर चालकाने अचानक ब्रेक लावला. त्यामुळे भरधाव वेगात असलेली स्विफ्ट कार कंटेनरच्या आतील भागात जाऊन घुसल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात अजय, कबीर आणि अनुज हे तिघे जागीच ठार झाले, तर चालक अजित गंभीर जखमी झाल्याने त्याच्यावर मुलुंड येथील व्होकार्ड हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला असून त्याच्याविरोधात कळवा पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार प्रवीण संखे यांनी नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. या अपघाताचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक व्ही. सी. गावित करत आहेत.