मंगळवार, 16 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. डॉ.आंबेडकर
Written By

बाबासाहेब म्हणजे अंधारातला एक दीपस्तंभ

डॉ. आंबेडकर म्हणजे महाप्रलयातला एक निवारा, अंधारातला एक दीपस्तंभ, महाराष्ट्राचेच नव्हे तर अखंड भारताचे भूषण, नवभारताची घटना बनविणारे ते कायदे पंडित आहेत. हिंदुधर्माची नवस्मृती देणारे, स्त्रियांची मान उंच करणारे ते नवस्मृतिकार ठरले. ज्या समाजाला आजवर आम्ही दूर ठेवले त्या समाजाला नवा धर्म देणारे ते धर्मदीप होते.
 
अति दारुण परिस्थितीत ते वाढले. भयानक अडचणीत सयाजीराव महाराजांची मदत मिळाली. ते बॅरिस्टर झाले. त्यांनी महाडचा सत्याग्रह, पुण्याचा सत्याग्रह, नाशिकचा सत्याग्रह करून दलित समाज संघटित केला, त्यांच्यात चैतन्य आणले. हे आंबेडकरांचे सर्वात महान कार्य होय. डॉ. आंबेडकरांच्या घरी मोठे फर्निचर कधीच दिसणार नाही. परंतु ग्रंथांनी भरलेली कपाटे दिसतील. महर्षी सेनापती बापट म्हणत, ‘ डॉ. आंबेडकर खरे ब्राह्मण आहेत. ज्ञानाची उपासना करणारे आहेत. आंबेडकर म्हणजे एक प्रचंड महाप्रलय होय.’
 
आंबेडकरांनी राष्ट्रीय चळवळीपासून अलिप्त राहून आपला वेगळा पक्ष स्थापला व अस्पृशंच संरक्षणासाठी राजकीय तरतुदीचा आग्रह धरला. त्यामुळे त्यांना राष्ट्रद्रोही म्हणू लागले. पण त्याला  कोणता आधार नाही. विरोधकांना बदनाम करण्यासाठी बहुसंख्य समाजाचे प्रवक्ते पुष्कळदा राष्ट्रैक्य निष्ठेचे हुकमी हत्यार उपसतात. आंबेडकरांचा राष्ट्राभिमान जाज्वल्य होता. याचे पुरावे त्यांच्या  लिखाणात आढळतात. अस्पृश्य समाज भारतीय समाजाचा एक अविभाज्य घटक असला तरी अल्पसंख्य म्हणून सवर्ण हिंदू समाजाहून त्याचे वेगळे असे स्वतंत्र अस्तित्व आहे. एवढेच त्यांचे  सांगणे होते. राष्ट्रातील फुटीर प्रवृत्तींना आळा बसून राष्ट्र बळकट व्हावे म्हणून केंद्रसत्ता नेहमी खंबीर ठेवली पाहिजे. अशीच तंची भूमिका होती. पुढे हिंदू धर्मातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तेव्हा राष्ट्रीय ऐक्याला बाधा येऊ नये म्हणून भारतीय परंपरेशी सुसंगत असा बौद्ध धर्म स्वीकारला. राष्ट्रप्रेमाबरोबर लोकशाहीवरही त्यांची अपार श्रद्धा होती. देशातील संस्कृतीत रुजलेला बौद्ध धर्म  स्वीकारणारे आंबेडकर धर्मद्रोही कसे? हे वादळ सडेतोड, निर्भीड, कर्तव्यकठोर होते. स्त्रिांना ताठ मानेने जगावयास लावणारे आंबेडकर, दलितांच्या सर्वागीण व्यक्तिमत्त्वाचा विकास घडविणारे आंबेडकर हे या भारताच्या इतिहासाचे एक सोनेरी पान आहे. कार्ल मार्क्सचा ‘वर्गकलह’ हा शब्द जगात जसा गाजला तसा आंबेडकरांचा ‘जातिकलह’ हा शब्द सर्व जगात निनादला. आंबेडकरांची चळवळ, दलितांच संघटना, चळवळीचे यश व अपयश सध्या महाराष्ट्रात एका वादळात तशाच घिरटय़ा घेत आहेत. याचे कारण म्हणजे आंबेडकरांना योग्य शिष्य मिळाले नाहीत. राजकीय डावपेच, उणे-दुणे, थोडासा स्वार्थ, स्वत्वाची तहान या गोष्टींमुळे ही चळवळ थांबली आहे. सध्याचे  नेतृत्व लंगडे आहे. अनेक गट, पक्ष यामुळे समाज चक्रात सापडला आहे. विशिष्ट दलित वर्ग हाच चळवळीसाठी धडपडतो आहे. पुढे धावतो आहे, संघर्ष करतो. बाकीचे दलित आपल्याच गटात, प्रभागात संघटना करून स्तब्ध आहेत. काही सत्ताधारी पक्षाकडे स्वप्रगतीसाठी लाळ घोटत आहेत. तर काही स्वाभिमानाने सत्ताधार्‍यांना चुकीचा मार्ग दाखवून मार्ग काढत आहेत. सर्व दलितांनी आंबेडकरांच्या विचारांचे मंथन पाहून एकत्र येण्याची गरज आहे. संघशक्तीशिवाय विकास नाही हे ओळखले पाहिजे. सच्चा अनुयायांनी दलित समाजातील विस्कळीतपणा नाहीसा होण्यासाठी   चळवळीला हातभार लावावा. दलित समाजाची एकजूटच आंबेडकरांची चळवळ नेटाने पुढे घेऊन जाईल.
 
लेखनक्रीडा आंबेडकरांना मुळीच मान्य नव्हती. जीवनसंबंध संघर्ष विचार करणाराच त्यांचा लेखनधर्म होता. माणसाच्या मुक्तीचा विचार हाच त्यांच्या लेखणीचा ध्येवाद होता. धर्मपरिवर्तनाच्या क्षेत्रात ‘बुद्ध अँन्ड हिज धम्म’ हा तंचा ग्रंथ नवीन संहिता झाला. बहिष्कृत भारत जनता साप्ताहिकातून समाजव्यवस्थेतील हीन परंपरेवर आगपाखड करून दलितांच्या जीवनात त्यांनी दीप लावला. अनेक महान ग्रंथ लिहून आंबेडकरांनी देशाला ज्ञान देण्याचा चंग बांधला होता. या समाजाला उजळून काढले पाहिजे. समाजाची नवनिर्मिती केली पाहिजे, ही काळाची गरज आहे.
 
डॉ. प्रमोद लांडगे