शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. बॉलीवूड
  3. सिनेगप्पा
Written By
Last Updated : मंगळवार, 22 सप्टेंबर 2020 (14:54 IST)

कंगनाचं जाहीर आव्हान : तर माफी मागून कायमचं ट्विटर (twitter)सोडून देईन

राज्यसभेत मांडण्यात आलेल्या कृषी विधेयकांना विरोध करणाऱ्यांना दहशतवादी म्हणून उल्लेख केल्याने अभिनेत्री कंगना रणौतवर टीका होत आहे. काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी ट्विट करत कंगना शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणाली असून मोदी सरकार आणि भाजपा नेत्यांनी सर्व शेतकऱ्यांची माफी मागितली पाहिजे अशी मागणी केली होती. दरम्यान कंगनाने नव्याने ट्विट करत आपण शेतकऱ्यांना दहशतवादी म्हणालो असल्याचं सिद्ध केल्यास माफी मागून ट्विटर (Twitter)कायमचं सोडून देईल असं आव्हान दिलं आहे.
 
कंगनाने ट्विटमध्ये काय म्हटलं आहे-
“ज्याप्रमाणे श्रीकृष्णाची नारायणी सेना होती, त्याचप्रमाणे पप्पूची एक चंपू सेना आहे जी फक्त अफवांच्या आधारे लढते. जर माझ्या मुख्य ट्विटमध्ये मी शेतकऱ्यांना दहशतवादी म्हटलं असल्याचं कोणी सिद्ध केलं तर माफी मागून कायमचं ट्विटर (twitter)सोडून देईन,” असं कंगनाने ट्विटमध्ये म्हटलं आहे.

कंगना काय म्हणाली होती?
नरेंद्र मोदींनी कृषी विधेयकासंबंधी केलेल्या ट्विटवर कंगनाने ट्विट केलं होतं. त्यात तिने म्हटलं होतं की, “प्रधानमंत्रीजी कोणी झोपलं असेल तर त्याला जाग केलं जाऊ शकतं, गैरसमज असेल त्याला समजावलं जाऊ शकतं. मात्र जे झोपण्याचं नाटक करत आहेत, न समजल्याचं नाटक करत आहेत त्यांना तुमच्या समजावण्याने काय फरक पडणार? हे तेच दहशतवादी आहेत ज्यांनी CAA मुळे एकाही व्यक्तीचे नागरिकत्व गेले नाही मात्र रक्ताचे पाट वाहून टाकले”.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आपण कंगनाच्या ट्विटशी सहमत नसल्याचं म्हटलं आहे. विचार न करता बोलणाऱ्या ट्वीटचे आम्ही कधी समर्थन केलं नाही आणि करणार देखील नाही असं चंद्रकांत पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं.