शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. धर्म
  2. गणेशोत्सव
  3. गणेश स्तवन
Written By

गुणी पती मिळण्यासाठी करा हे व्रत...

आपल्या धर्मात एक असे ही व्रत आहे जे भक्तिभावाने व निष्ठेने केल्यास गुणी, सुरेख पती लाभतो. हे व्रत केल्याने अखंड सौभाग्य व संतती लाभते. भाद्रपद शुद्ध तृतीयेला हरतालिका हे व्रत केले जाते. हा सण खास करून कुमारिकांसाठी आहे. तसेच विवाहित स्त्रिया हे व्रत करतात.
या दिवशी मुली व सुवासिनी सुवासिक तेल लावून स्नान करतात. स्नान केल्यानंतर नदीतील वाळू आणून तीन शिवलिंगे करून भक्तिपूर्वक पूजा करतात, अगर शहरांतून सखीसह पार्वतीच्या मातीच्या प्रतिमा व शिवलिंगे मिळतात, ती आणून पूजा करतात. सर्व दिवसभर कडक उपोषण करून पाणीही पिऊ नये अशी रूढी आहे. मात्र ज्यांना सहन होत नाही ते फलाहार करतात पण आगीवर बनविलेला कोणताही पदार्थ खात नाहीत. रात्री जागरण करून हरतालिकेची कथा ऐकून बारानंतर रुईच्या पानावर दही घालून ते चाटतात. दुसरे दिवशी सकाळी उत्तरपूजा करून ती लिंगे विसर्जन करतात.
 
काही लोकं हा पण विचार करतात की विवाह झाल्यानंतर मनासारखा पती मिळाल्यावर हे व्रत का करावे? पण एकदा घेतलेले शंकराचे व्रत मोडू नये अशी श्रद्धा असल्यामुळे महिला हे व्रत आजन्म करतात.
आधुनिक काळात या व्रतापासून शिकण्यासारखे म्हणजे की फक्त संपत्ती आणि ऐश्वर्य पाहून लग्नाचा निर्णय न घेता समोरच्याचे गुण आणि कर्तृत्वही पाहिले पाहिजे.