शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Updated : बुधवार, 10 एप्रिल 2019 (09:33 IST)

सत्ताधाऱ्यांकडून यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न – छगन भुजबळ

देशात सध्या जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून निवडणुकीच्या तोंडावर विरोधांचा आवाज दाबण्यासाठी सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याने याचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत देशात खुल्या वातावरणात निवडणुका पार पाडणे गरजेचे असल्याचे सांगितले. आज राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीच्या वतीने नाशिक व दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर कॉंग्रेस कमिटी कार्यालय नाशिक येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
 
यावेळी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंत पाटील, माजी मंत्री आ.बाळासाहेब थोरात, पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री शोभा बच्छाव, माजी खासदार देविदास पिंगळे, माजी महापौर अशोक मुर्तडक, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हंसराज वडघुले, श्रीराम शेटे, आ.पंकज भुजबळ, आ. नरहरी झिरवाळ, माजी आमदार डॉ.अपूर्व हिरे, दिलीप बनकर, जयवंतराव जाधव, नानासाहेब महाले, माजी जिल्हाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, डॉ.तुषार शेवाळे, अॅड. रवींद्र पगार, कोंडाजीमामा आव्हाड, विष्णुपंत म्हैसधूने, शरद आहेर, रंजन ठाकरे, मनपा गटनेते सलीम शेख, राहुल ढिकले, अण्णासाहेब कटारे, शशी उन्हवणे, लक्ष्मण जायभावे, अर्जुन टिळे, नगरसेवक शाहु खैरे, गजानन शेलार, राहुल दिवे, नगरसेविका वत्सला खैरे, सुषमा पगारे, समीना मेमन, महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, महिला शहराध्यक्ष अनिता भामरे, कल्पना पांडे, शोभा मगर, राजेंद्र  बागुल, सचिन पिंगळे, स्वप्नील पाटील, डॉ.सुभाष देवरे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस, कॉंग्रेस मित्रपक्षांच्या संयुक्त पुरोगामी आघाडीचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. 
 
यावेळी बोलतांना छगन भुजबळ पुढे म्हणाले की, सद्या देशात धर्मा-धर्मात जातीभेद पसरवून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. देशात निवडणुका या खुल्या वातावरणात पार पडणे आवश्यक आहे. मात्र सद्या सत्ताधाऱ्यांकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून उमेदवारांना धमकाविण्याचा प्रयत्न सुरु आहे. या कटकारस्थानांना जनता बळी पडणार नसून जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा टोला त्यांनी लगावला आहे. ते म्हणाले की, राष्ट्रवादी असल्याची भूमिका ही आपल्या जाहीरनाम्यातून देण्याची गरज नाही तसेच त्यासाठी कुठल्याही सर्टिफिकेटची गरज नसल्याची टीका त्यांनी भाजपच्या जाहीरनाम्यावर केली आहे.

यावेळी बोलतांना प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील म्हणाले की,  समाजात जटील समस्या असणाऱ्या जनतेला सोबत घेऊन नाशिक व दिंडोरीच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला असून हे युवा नेतृत्व पुढील काळात जिल्ह्यातील जनतेचे प्रश्न यशस्वीपणे सोडवतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आघाडी सरकारच्या काळात नाशिक जिल्ह्यात भुजबळांच्या माध्यामतून अनेक विकास कामे केली गेली. मात्र गेल्या पाच वर्षात जिल्ह्याचा विकास खुंटला गेला आहे. सरकारच्या नाकर्तेपणामुळे देशातील शेतकरी व सर्वसामान्य नागरिक अडचणीत सापडला आहे. तसेच सरकारकडून जाती पातीच राजकारण केले जात आहे. खुद्द राज्याचे मुख्यमंत्री याला खतपाणी घालत असून मुख्यमंत्र्यांची मानसिकता बिघडली असल्याची टीका त्यांनी केली. 
 
ते म्हणाले की, देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच देशाचे पंतप्रधान हे स्वतः प्रचाराला उतरून विरोधी पक्षातील नेत्यांविषयी अत्यंत खालच्या पातळीवर टीका टिपणी  करतांना दिसत आहे. तसेच निवडणुकीच्या काळात सरकारी यंत्रणेचा गैरवापर करून विरोधी पक्षातील नेत्यांवर सूडबुद्धीने कारवाई करण्याचा प्रयत्न केला जात आहे. याबाबत निवडणूक आयोगाने स्वतः लक्ष घालून त्यांच्यावर कारवाई करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच मोदी सरकारने जाहीरनामा न काढता पाच वर्षात केलेल्या गैरकारभाराबाबत माफीनामा काढण्याची गरज होती असे सांगून भाजपच्या जाहीरनाम्यात कुठलाही दम नसल्याची टीका त्यांनी यावेळी केली. 
 
यावेळी नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी आणि नाशिक मधील दोनही उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. तर  पिपल्स रिपब्लिकन पक्षाचे प्रा.जोगेंद्र कवाडे यांनी सरकारच्या कारभारावर सडेतोड टीका करून जनतेने आघाडीच्या सोबत राहण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.