गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

waterfalls in Ratnagiri : रत्नागिरी जिल्ह्यातील धबधबे

कोकणातील पावसामुळे कोकणचं सौंदर्य आणखीणच खुलून दिसते. मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वच धबधबे ओसंडून वाहतात. पूर्वी कोकणात उन्हाळी पर्यटनासाठी लोंकांची गर्दी व्हायची परंतु आता पावसाळी पर्यटनासाठी लोकांची गर्दी कोकणात होत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील धबधब्याची सफर आपण या लेखाद्वारे करुया.
निवळीचा धबधबा : मुंबई- गोवा महामार्गाने रत्नागिरीकडे जाताना संगमेश्वरपासून 20 किलोमीटर अंतरावर रस्त्याच्या कडेला उभे राहून निवळीच्या धबधब्याचे दर्शन घडते. उंच डोंगरावरील दाट झाडीतून खाली कोसळणाऱ्या धबधब्याचे सौंदर्य पाहणे हा आनंददायी अनुभव असतो. थोडे पुढे गेल्यावर खाली जाणाऱ्या पायऱ्या आहेत. या मार्गाने खाली जाऊन धबधब्यात भिजता येते. पावसाळ्यात मात्र दुरुनच सौंदर्य न्याहाळलेले अधिक चांगले. (रत्नागिरी-निवळी अंतर 18 किलोमीटर आहे.)

रानपाटचा धबधबा : मुंबई- गोवा महामार्गावरुन प्रवास करताना संगमेश्वरच्या पुढे उक्षी गावाकडे जाणारा रस्ता आहे. गावापासून गणपतीपुळे 32 किलोमीटर अंतरावर आहे. या रस्त्यानेच रानपाट गावापर्यंत वाहनाने जाता येते. गावापासून पंधरा ते वीस मिनिटे चालत गेल्यास धबधब्यापर्यंत पोहोचता येते. कोकण रेल्वेने रत्नागिरीला येताना उक्षी स्थानक ओलांडल्यावर उजवीकडे उंचावरुन कोसळणाऱ्या धबधब्याचे दर्शन घडते. परिसरातील हिरव्या निसर्गाच्या पार्श्वभूमीवर या धबधब्याचे सौंदर्य खुलून दिसते. धबधब्याकडे जाताना मात्र रेल्वेरुळाजवळ थांबू नये.
वीरचा धबधबा : तुरंबव येथून आबलोलीकडे जाताना 10 किलोमीटर अंतरावरील वहाळ या गावापासून वीर बंदर 10 किलोमीटर अंतरावर आहे. वीर येथे देवपाटचा बारामाही धबधबा आहे. हा धबधबा दोन टप्प्यांत आहे. काळ्या कातळातून डोहात कोसळणाऱ्या आणि पोफळीच्या दाट रांगांच्या बाजूला असणाऱ्या या धबधब्याचे सौंदर्य काही वेगळेच आहे. धबधब्यापर्यंत जाणारा रस्ता दाट झाडीतून जातो.
सवतसडा धबधबा : चिपळूणपासून 5 किलोमीटर अंतरावर सवतसडा धबधबा आहे. मुंबईहून येताना महामार्गाच्या कडेला डाव्या बाजूस उंचावरुन हा धबधबा कोसळताना दिसतो. जुलै ते ऑक्टोबर या कालावधीत या धबधब्याला भरपूर पाणी असते. शनिवार आणि रविवार येथे पर्यटकांची गर्दी होते. पर्यटकांसाठी येथे शेड आणि धबधब्यापर्यंत पाऊलवाटेची व्यवस्था करण्यात आली आहे. पावसाळ्यात पाण्याचा ओघ अधिक असल्याने जरा जपूनच पाण्यात उतरलेले चांगले. चिपळूण आणि सवतसडा धबधब्याच्या दरम्यान रस्त्याच्या कडेला पेढे या गावातील दत्त मंदिरही भेट देण्यासारखे आहे.
मार्लेश्वर धबधबा : संगमेश्वर तालुक्यात देवरुख पासून 18 किलोमीटर अंतरावर सह्याद्रीच्या निसर्गरम्य दऱ्याखोऱ्यात वसलेले श्रीक्षेत्र मार्लेश्वर श्री शंकराचे देवस्थान म्हणून ओळखले जाते. डोंगराला वळसा घालून उंच कड्यावर गेल्यावर हे देवस्थान आहे. या डोंगरावर एक मोठा धबधबा आहे.