शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019
Written By
Last Modified: शुक्रवार, 11 ऑक्टोबर 2019 (10:00 IST)

माझा आवाका मला माहिताय, उंटाचा मुका घेणार नाही, सत्ता नको, विरोधी पक्षाची संधी द्या : राज ठाकरे

आजच्या घडीला सर्व राजकीय स्थिती पाहता, मला माझा आताचा अवाका माहीत आहे. विनाकारण जाऊन उंटाच्या ढुंगणाचा मुका कोण घेत बसणार. आपल्या आपल्या गोष्टी आपल्याला कळल्या पाहिजेत, सत्ता नको, प्रबळ विरोधीपक्ष म्हणून संधी द्या, असं राज ठाकरे म्हणाले.मनसे अध्यक्ष राज ठाकरे अखेर यांची पहिली सभा मुंबईत पार पडली आहे. मात्र राजकारणाच्या इतिहासात प्रथमच सत्ता नाही तर राज्याच्या प्रमुख विरोधी पक्षाची मागणी ठाकरे यांनी केली आहे. सरकार जरी असले तरी त्याला वठणीवर आणणारे असा पक्ष असतो तोच प्रतिसरकार म्हणजे विरोधी पक्ष असतो, त्यासाठी मला माझे आमदार निवडणून द्या अशी मागणी राज यांनी सभेत केला आहे. या त्यांच्या मागणीला सोशल मिडीयावर जोरदार प्रतिसाद मिळाला आहे. कारण राज यांनी पूर्ण राज्यात उमेदवार दिले नाहीत त्यामुळे पूर्ण सत्ता न  नको  तर येणाऱ्या सरकारला जनतेचा राग काय असतो ते दाखवायाला विरोधी पक्ष म्हणून ताकद दया अशी मागणी त्यांनी केली आहे. 
 
राज यांचे पूर्ण भाषण :
१) कालची पुण्याची सभा वादळी पाऊसामुळे रद्द करावी लागली. त्यात काल पीएमटी बस चालक बसवर झाड पडून मृत्युमुखी पडला. बघा काय अवस्था आहे आपली. घराबाहेर पडल्यावर काय होईल माहित नाही. पुण्यासारख्या शहराची ही अवस्था. अर्ध्या तासाच्या पावसाने शहराचा पार विचका झाला. तर इथे ठाण्यात एक मुलगी स्वतःच्या लग्नाची खरेदी करायला निघाली आणि खड्ड्यात पडून ती अपघातात मृत्युमुखी पडली. काय दुर्दैवी घटना आहे ही.
 
२) शहरांचं नियोजन कोसळलंय, निवडणुका आल्या की जाहीरनामे बाहेर येतात, वाट्टेल ती आश्वासन दिली जातात. पुन्हा परिस्थिती जैसे थे. आणि विरोधी पक्षाचे नेतेच सत्ताधारी पक्षात जाऊन बसतात आणि सत्ताधारी आमदारांची हिंमत नाही सरकारला प्रश्न विचारायची, मग तुमचे प्रश्न मांडणार कोण?
 
३) पीएमसी बँक बुडाली, लोकांचे हक्काचे पैसे त्यांना काढता येत नाहीयेत. बरं ह्या बँकेवर अधिकारी पदावरची माणसं कोण? तर भाजपची. शेतकरी, कामगार देशोधडीला लागलेत, तरुण बेरोजगार झालेत आणि सरकार कसंही वागतं, न्यायालयांकडून निर्णय मिळत नाहीत. मग जनतेचा राग कोण व्यक्त करणार?
 
४) आज शहरं खड्ड्यात आहेत, लोकं खड्ड्यात पडून मरत आहेत.. बेरोजगारी टोकाला आहे, उद्योग बंद पडत आहेत. काय झालंय लोकांना? त्यांच्या जाणिवांना? बाबासाहेब पुरंदरे एक वाक्य नेहमी म्हणतात,'जाणिवा नसलेली लोकं म्हणजे जिवंत प्रेतं'. ह्या सगळ्या घटना बघितलं की वाटतं, आपल्या जाणिवा शून्य झाल्यात आपण फक्त प्रेतं झालो आहोत? आणि जर विरोधी पक्षातले नेते सरकारसमोर घरंगळत जाणार असतील आणि जनता सुद्धा सरकारला जाब विचारणार नसेल तर ह्या सरकारला प्रश्न विचारणार तरी कोण आहे?
 
५) मी या विधानसभेला तुमच्याकडे एक मागणं घेऊन आलोय; ते मागणं म्हणजे, ह्या राज्याला गरज आहे सक्षम, प्रबळ, कोणासमोर न घरंगळत जाणारा विरोधी आवाज हवाय. सत्तेतला आमदार सरकारला प्रश्न विचारू शकत नाही पण विरोधी पक्षातला आमदार सरकारला नामोहरम करू शकतो, मी आज प्रबळ विरोधी पक्ष म्हणून समोर येतोय.
 
६) आज गरज आहे सरकारला प्रश्न विचारणाऱ्यांची आणि जर विधानसभेत प्रबळ विरोधी नसेल तर सरकार तुमच्यावर बुलडोझर फिरवेल. सत्तेसाठी आशीर्वाद घ्यायला मी भविष्यात येईनच पण आज गरज आहे ह्या निरंकुश सरकारला जाब विचारणाऱ्या आवाजांची.
 
७) माझे उमेदवार तरुण आहेत त्यांच्या पोटात आग आहे, त्यांना संधी द्या, त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा, ते तुमच्यासाठी आवाज उठवतील, सरकारला सळो की पळो करून सोडतील... सत्ताधारी आमदार कामं करत नाहीत हे आता उघड झालं आहे पण माझे विरोधी पक्षात बसलेले आमदार सरकारकडून कामं करून घेतील.