1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. मराठा आरक्षण
Written By
Last Modified: मंगळवार, 27 ऑक्टोबर 2020 (14:46 IST)

सरकारनं मराठा आरक्षणाबाबत त्वरित पावलं उचलावीत : छत्रपती संभाजीराजे

“मराठा समाजासाठी (Maratha) मी माझा जीव धोक्यात घालून फिरत आहे. सरकारला काय सांगायचं? आता मी बोलून थकलो आहे. सरकारनं मराठा आरक्षणाबाबत  त्वरित पावलं उचलावीत एवढीच माझी विनंती आहे, आता मी थकून गेलो आहे,” अशी प्रतिक्रिया खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी दिली.
 
“मी किती वेळा बोलायचं. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व ठिकाणी फिरत असतो. जालना, कोल्हापूर, नवी मुंबई या ठिकाणी होतो. मी आता बोलून बोलून थकलो आहे. मी गर्दीत सोशल डिस्टन्सिंग न पाळता फिरत आहे. मी माझा जीव धोक्यात घालून सर्व समाजासाठी करत आहे,” असं संभाजीराजे म्हणाले.
 
“मराठा आरक्षणाबाबत (maratha reservation) अजूनही वेळ गेलेली नाही, सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत. एवढीच विनंती आहे. मी थकलो आहे. थकून गेलो आहे,” असं संभाजीराजे छत्रपती म्हणाले. फ्लोअर मॅनेजमेंट व्यवस्थित व्हावं असं मी अनेक दिवसांपासून सांगत आहे. दोन दिवसांपूर्वी माझं अशोक चव्हाण यांच्याशीदेखील बोलणं झालं होतं. त्यावेळी मी त्यांना उपसमितीची बैठक आयोजित करण्याची विनंती केली होती. तीदेखील सध्या झालेली दिसत नाही. याचंच आपल्याला आश्चर्यही वाटत असल्याचं ते म्हणाले.
 
“सुनावणीदरम्यान सरकारी वकील कुठे आहेत असा सवाल न्यायालयाकडून करण्यात येतो. त्यावेळी ते उपस्थित नसणं हे दुर्देवी आहे. मराठा समाजाला (Maratha) अशा पद्धतीनं गृहित धरायला लागले आहेत का ? आमचा सरकारी वकिलांवर पूर्णपणे विश्वास आहे. त्याबद्दल कोणतंही दुमत नाही. आपली बाजू मांडणं महत्त्वाचं आहे,” असंही संभाजीराजे म्हणाले. 
 
मराठा आरक्षण हा विषय गांभीर्यानं घ्यावा, त्यातील बारकावे समजून घ्यावे ही यापूर्वीपासून सरकारला सांगत आलो आहे. काही तांत्रिक घोळ झाल्याचं माझ्या कानावर आलं आहे. परंतु पुढील सुनावणीला कोणी उपस्थित न राहिल्यास चुकीचा संदेश जाईल. जी कोणतीही चूक झाली ती ताबडतोब दुरूस्त करण्यात यावी असंही ते म्हणाले.