गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मनोरंजन
  2. हास्यकट्टा
  3. व्हॉट्सअप मॅसेजेस
Written By

पुणेरी मेनू असा असावा: काटेकोर पुणेकर

वरण- भात, तूप, मीठ, लिंबू- त्यात शक्य असल्यास चमचाभर पुरण, मसाले भात पण त्यावर ताज्या ओल्या नारळाच किसलेलं खोबरं आवश्यक, पुर्‍या, अळूची शेंगदाणे- खोबरे घालून केलेली भाजी,सुकी बटाटा भाजी, गोड-आंबट आमटी, पापड-कुरडई, कोथिंबीर वडी किंवा घोसळा भजी, ओल्या नारळाची कोथिंबिरीची चटणी, काकडी-कूट दही घातलेली कोशिंबीर, चवी पुरतं पंचामृत, गोडात श्रीखंड किंवा बासुंदी, मठ्ठा.
 
यावर पुणेरी काय म्हणतात लक्षपूर्वक वाचा... 
 
आम्ही अंमळ तिखट कमी खातो तेव्हा भरमसाठ मसाल्याचा मारा नको. 
तेलात आम्हांस पोहावयाचे नाही, तेव्हा तवंगाचा तलाव नको.
श्रीखंड असेल तर वाटी चमचा हवाच, उगाच श्रीखंड बचकन पानात वाढू नये...
आम्ही बोटाने चाटत श्रीखंड खात नाही...श्रीखंडाशी अशी प्रतारणा आम्हांस मान्य नाही...
अळूच्या भाजीतील शेंगदाणे आख्खे असावे, उगाच तुकडे तुकडे टाकू नये...
तसेच खोबरे देखील पाऊण इंचा पेक्षा जास्त लांबीचे नको.
मठ्ठा हा प्रमाणशीर थंड असावा. त्यातील मीठ, साखर, ताक-पाण्याचे प्रमाण, आलं, कोथिंबीर योग्य
प्रमाणातच हवी, त्यात मिरचीचे तुकडे घालणार असाल ते 5 ते 6 मी.मी. पेक्षा जास्त लांबीचे नको.
वरणाची डाळ एक-पात्रीच हवी, नाहीतर चव बदलते.
पापड-कुरडई मरतुकडे नको....त्याच्यातला कुरकुरीतपणा निघून गेल्यास आमची कुरकूर सुरू होईल...
गोडात सुधारस ठेवल्यास तो एक तारीच असावा, लिंबू योग्य प्रमाणात असावे.
ताटातली भजी आणि भाजी ही चमचमीत हवी...तिखट नको...
त्यामुळे उगाच गुलाल उधळल्यासारखं तिखट त्यात उधळू नये...
 
 
आता पान वाढण्याच्या सूचना
 
पाट मांडून त्यासमोर छान रांगोळी घालावी..
पानाच्या डाव्या बाजूला लोटी भांडे ठेवावे...
पान समोर ठेवून अगदी पुढचा भाग शून्य अंश पकडून मीठ वाढावे आणि 
त्याच्या उणे पाच अंशावर लिंबू अन मग क्रमाने पाच-पाच अंशावर चटणी, पंचामृत, कोशिंबीर, लोणचे वाढावे...
उणे 90 अंशावर पापड, त्याखाली पुरी वाढावी.
मध्यभागी भाताचा मुद असावा व सगळं वरण भसकन वाढू नये...वरणाचा ओघळ नको...
मुदाचा आकार प्रमाणशीर असावा...भसाडा नको...
वरण-भाता खाली मसाले भात वाढावा
मसाला भाताच्या उजव्या बाजूलाच भाजी वाढलेली असावी..आणि त्याच्या बरोबर वर आमटीची वाटी असावी.
उजव्या हाताला वरच्या साइडला 45 अंशावर गोडाची वाटी असावी व त्याच्या वर मठ्ठा वाटी असावी.
आमटी व भाजी गोडाच्या खाली असावी.
वर नमूद केलेल्यात काही त्रुटी असल्यास दुरुस्त कराव्यात, उगाच आमच्या चुका आम्हाला दाखवू नये.
बस एवढेच अपेक्षित आहे. सूचना संपल्या.
 
 
 
"काटेकोर"  पुणेकर