शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. लाईफस्टाईल
  2. बाल मैफल
  3. बालकथा
Written By
Last Modified: सोमवार, 19 ऑक्टोबर 2020 (12:17 IST)

'मूर्ख कासव'

एका तलावात गोट्या नावाचा एक कासव राहत असतो. त्याची मैत्री त्या तलावाच्या जवळ राहणाऱ्या दोन हंसाशी असते ते दोघे भाऊ असतात. त्यांचं नाव राजू आणि विजू असत. ते तिघे खूप चांगले मित्र असतात. तलावाच्या काठी ते तिघे दररोज संध्याकाळच्या वेळी बसून गप्पा मारायचे आणि खेळायचे बागडायचे आणि परत आपापल्याघरी निघून जायचे. 
 
एका वर्षी त्या भागात पाऊसच आला नाही सर्वीकडे ओसाड झाले होते. उष्णता वाढल्यामुळे कोरड पडली असे. हळू-हळू ते तलाव पण सुकत होतं. राजू आणि विजूला गोट्याची फार काळजी होऊ लागली. त्यांनी आपली काळजी कासवाला सांगितली त्यावर कासवाने त्याना काहीही काळजी करू नका असे सांगितले, आणि आधी तुम्ही जाऊन एखादे पाण्याने भरलेले तलाव बघून या, असे सांगितले. त्यावर ते दोघे पाण्याच्या शोधात निघाले. त्यांनी जवळच एका गावाच्या पलीकडे पाण्याने भरलेलं तलाव बघितलं. आणि येऊन आपल्या मित्राला सांगितलं.
 
आता प्रश्न असा उद्भवला की कासवाला तिथे कसं न्यायचं? त्याला इथे वाळवन्टात एकटं देखील सोडता येतं नव्हत. बऱ्याच वेळ विचार करून त्यांना एक युक्ती सुचली. कासव म्हणाला की तुम्ही दोन्ही बाजूने एक लाकूड आपल्या तोंडात धरा मी त्याचा मधल्या भागाला आपल्या तोंडात धरून ठेवेन. मग तुम्ही मला इथून उडत उडत घेउन जा. त्याचे म्हणणे ऐकून ते तयार झाले पण ते म्हणाले की ठीक आहे. पण तू काहीही झाले तरी अजिबात आपले तोंड उघडायचे नाही. कासवाने त्यांना होकार देऊन आश्वासन दिले की तो अजिबात कोणत्याही परिस्थितीमध्ये आपले तोंड उघडणार नाही. त्यांनी मधून लाकूड तोंडात धरलं आणि दोन्ही हंस त्याला घेउन उडू लागले. 
 
उडत उडत ते एका गावाच्या वरून निघताना काही लोकांनी त्यांना बघून ओरडायला सुरवात केली. त्यांना ओरडताना बघून कासवाने काही बोलण्यासाठी तोंड उघडणारच की तो विसरला की आपण कोठे आहोत. तोंड उघडतातच तो उंचावरून खाली पडला आणि मरण पावला. त्याने आपल्या मित्रांचे म्हणणे ऐकले नाही म्हणून त्याला आपले प्राण गमवावे लागले.