गुरूवार, 2 ऑक्टोबर 2025
  1. लाईफस्टाईल
  2. मराठी साहित्य
  3. मराठी कविता
Written By
Last Modified: सोमवार, 20 सप्टेंबर 2021 (20:57 IST)

खरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती

marathi poem
खरंय म्हणणं असं, मन चिंती ते वैरी न चिंती,
कांहीं न काही कारणे, मनाची झालेली दयनीय स्थिती,
सुचत नाही कसं बाहेर पडावं ह्यातून,
काही जादू तर होणार नाही ना चुकून!
आपल्या परी झगडतं मन मार्ग शोधण्या,
आपल्या पातळीवरील लढाई लढण्या,
कोणाची मदत त्यास कधी कधी वाटे घेऊ नये,
आलेलं आव्हान स्वतः च पेलून का बघू नये?
पण आव्हान कधी कधी पेलवत नाही हे खरं,
तोंडघशी पडतो की काय असं वाटून जातं बरं,
म्हणून वाटत घ्यावी मदत हवीच कोणाची,
स्वतः लाच सवरण्यास द्यावी हाक मदतीची !
हाच आहे खरा मार्ग, बाहेर पडण्याचा,
योग्य तो मार्ग मिळविण्यासाठी धडपडण्या चा!!
.....अश्विनी थत्ते