बुधवार, 17 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: शुक्रवार, 13 नोव्हेंबर 2020 (18:54 IST)

हे तर भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार आहे : किरीट सोमय्या

“ठाकरे सरकार हे भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार आहे,” असं म्हणत भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी केला. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मी विचारलेल्या पाच प्रश्नांची उत्तरं द्यावी. मी विचारलेल्या पाच प्रश्नांपैकी त्यांनी एका प्रश्नाचं तरी उत्तर द्यावं असं आव्हान त्यांनी मुख्यमंत्र्यांना दिलं. किरीट सोमय्या यांनी  मुंबईत पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी शिवसेनेला हिंमत असेल तर हात लावून दाखवाच असंही म्हटलं.
 
“ठाकरे सरकार म्हणजे रिअल इस्टेटमध्ये भूखंडाचं श्रीखंड लाटण्यात गुंतलेलं सरकार दिसत आहे. मी याआधी दहिसर जमीन घोटाळ्याचा विषय काढला होता. संजय राऊत ऐकत असतील तर त्यांनी स्पष्ट ऐकावं. जी जमीन २ कोटी ५५ लाखांत अल्पेश अजमेरा बिल्डरने घेतली ती ९०० कोटीत विकत घेण्यासाठी मुंबई महापालिका निघाली आहे. यामधील ३५४ कोटी आधीच दिले आहेत,” असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे.
 
“दहिसर भूखंड घोटाळ्याची कागदपत्र आमच्याकडे आहेत. आम्ही जमीन घोटाळ्याची कागदपत्र राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे सोपवली होती. या घोटाळ्याप्रकरणी आम्ही राज्यपालांकडे तक्रार दाखल केली होती. यांतर राज्यपालांनी लोकायुक्तांना चौकशीचे आदेशही दिले आहेत,” अशी माहिती सोमय्या यांनी यावेळी दिली.