गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 3 मार्च 2021 (13:35 IST)

आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूक: राहुल गांधी

नवी दिल्ली- काँग्रेस नेते आणि इंदिरा गांधी यांचे नातू राहुल गांधी यांनी आजीचा आणीबाणी लावण्याचा निर्णय चूकीचा असल्याचे विधान केले आहे. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1975 ते 1977 या दरम्यान 21 महिने देशांतर्गत आणीबाणी लावली होती. 
 
इंदिरा गांधींचा तो आणीबाणी लावण्याचा निर्णय भारतीय राजकारणातील वादग्रस्त विषय असून इतर पक्षातील लोक या निर्णयावर आजही टीका करत असतात. पहिल्यांदाच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी या विषयावर त्यांच मत देशाचे माजी आर्थिक सल्लागार कौशिक बसू यांना नुकतीच एक मुलाखत दिली असताना व्यक्त केले आहे.
 
मुलाखतीमध्ये त्यांना आणीबाणीबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर त्यांनी म्हटले की 'माझ्या मते ती एक चूक होती. त्यावेळी जे घडलं ते नक्कीच चूक होतं. कॉर्नेल विद्यापीठाच्या एका कार्यक्रमात व्हर्च्युअल चर्चेत राहुल गांधींनी हे वक्तव्य केलं. पण केंद्रातील विद्यमान मोदी सरकारचा संदर्भात देत त्यांनी हे वक्तव्य केलं. 
 
काँग्रेस पक्षाने कधीही घटनात्मक संरचना बळकावण्याचा प्रयत्न केला नाही. आमच्या पक्षाच्या रचना आम्हाला असं काही करण्याची परवानगी देत नाही. इच्छा झाली तरीही आम्ही असं करू शकत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
 
काँग्रेस पक्षामध्ये अंतर्गत लोकशाही मागणी होत असल्याच्या विषयावर राहुल गांधी म्हणाले की, पक्षांतर्गत लोकशाही आवश्यक असल्याचं मी आमच्या पक्षातील नेत्यांना सांगितले आहे.
 
त्यांनी भाजपवर हल्ला बोलत हे देखील म्हटले की संसदेत चर्चेवेळी माइक बंद केला जातो. आम्हाला संसदेत बोलू दिले जात नाही. लोकशाहीवर मोठा हल्ला होतोय. तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघ प्रत्येक ठिकाणी घुसखोरी करत आहे. संघाकडून घटनात्मक पदावर त्यांची माणसं भरली जात आहेत. आम्ही निवडणुकीत भाजपाला हरवलं तरी या लोकांना काढू शकत नाहीत.