1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: बुधवार, 17 जानेवारी 2024 (16:46 IST)

'शौर्य' चित्त्याचा अशक्त झाल्याने मृत्यू, कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच

मध्य प्रदेशातल्या कुनो अभयारण्यात चित्त्यांच्या मृत्यूचं सत्र सुरूच आहे. नामिबियातून भारतात आयात करण्यात आलेल्या आणखीन एका चित्त्याचा मृत्यू झालाय.
 
लायन प्रोजेक्टतर्फे देण्यात आलेल्या माहितीनुसार शौर्य नावाच्या चित्त्याचा 16 जानेवारीला दुपारी 3 वाजून 17 मिनिटे झाली असताना मृत्यू झाला. 'शौर्य'च्या मृत्यूचं कारण हे शवविच्छेदनानंतरच कळू शकेल, अशी माहिती देण्यात आलीय.
 
मंगळवारी (16 जानेवारी) सकाळी या चित्त्याची तब्येत थोडी बिघडलेली दिसली. त्याची तपासणी केल्यानंतर तो आजारी असल्याचं सिद्ध झालं.
 
शौर्य अशक्त असल्यामुळे बेशुद्ध पडला होता. उपचारानंतर तो काही काळ शुद्धीत आला पण लवकरच त्याची तब्येत पुन्हा खराब होऊ लागली. शौर्यवर सीपीआरद्वारे उपचार करण्यात आले पण त्या उपचारांना प्रतिसाद मिळाला नाही.
 
सप्टेंबर 2022 ला केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी चित्ता पुनर्वसन कार्यक्रमात नामिबियाहून 8 चित्ते आणले गेले. त्यानंतरच्या टप्प्यात फेब्रुवारी 2023 ला आणखीन 12 चित्ते दक्षिण आफ्रिकेवरून मध्यप्रदेशातल्या कुनो अभयारण्यात आणून सोडण्यात आले.
 
त्यातल्या दहा चित्त्याचं आत्तापर्यंत मृत्यू झाला असून काही नवीन चित्ते भारतात जन्माला देखील आले आहेत.
 
आफ्रिकेतून आणलेल्या आठव्या चित्त्याचा मृत्यू
2 ऑगस्ट 2023 ला या अभयारण्यात आणखी एका चित्त्याचा मृत्यू झाला होता. गेल्या काही महिन्यातील मृत्युमुखी पडलेला हा आठवा चित्ता होता.
 
कुनो अभयारण्यातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, भांडणामुळे या चित्त्याचा मृत्यू झाला असावा.
 
दगावलेल्या या चित्त्याचं नाव तेजस होतं. हा नर चित्ता जखमी अवस्थेत सापडला होता.
 
भारताने 1952 मध्ये चित्ते नामशेष झाल्याचं घोषित केलं होतं. त्यावेळेस देशामध्ये एकही जिवंत चित्ता शिल्लक नव्हता.
 
पण या प्रजातीचं पुनरुत्थान करण्याच्या महत्त्वाकांक्षी योजनेचा भाग म्हणून त्यांना गेल्या वर्षी भारतात आणण्यात आलं.
 
मे 2023 मध्ये नामिबियातून आणलेल्या मादी चित्त्याने जन्माला घातलेल्या 4 बछड्यांपैकी 3 जण दगावले होते.
 
सर्व चित्ते बछडे हे नाजूक आणि कमी वजनाचे होते. त्यांच्या शरीरातील पाण्याचं प्रमाणही लक्षणीयरित्या कमी झाल्याचं कुनो येथील वन अधिकाऱ्यांनी त्यावेळी सांगितलं होतं. तर प्रौढ चित्ते हे किडनी निकामी होऊन, वीण जखमा होऊन दगावले.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठी प्रसिध्दी करत चित्ते आणल्याचं देशवासीयांना सांगितलं होतं. काही वन्यजीव तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केलं असलं तरी काहींनी संभाव्य धोके आणि मोठ्या मांसाहारी जनावराच्या शिकारीवरून इशारेही दिले होते.
 
मे 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने चित्त्यांच्या मृत्यूबद्दल चिंता व्यक्त करताना केंद्र सरकारला या चित्त्यांना लवकरात लवकर इतर पर्यायी ठिकाणी हलवण्यासाठी गांभीर्याने विचार करण्यास सांगितलं होतं.
 
भारतामध्ये चित्त्यांचं मोठं प्रतीकात्मक महत्त्व आहे कारण अनेक लोककथांमध्ये त्यांचा संदर्भ आढळतो. पण या प्राण्याची होत असलेली शिकार, अधिवासाच्या आणि भक्ष्याच्या कमतरतेमुळे 1947 नंतर भारतातून चित्ते नामशेष व्हायला सुरुवात झाली.


Published By- Priya Dixit