शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By

एका रसगुल्ल्यामुळे तुटले लग्न

मुलगा किंवा मुलगी पसंत न आल्याने किंवा अगदी फिल्मी स्टाइल वधू किंवा वर लग्नाच्या दिवशी पळून गेल्याने लग्न तुटल्याच्या बातम्या तुम्ही वाचल्या असतील. मात्र, उत्तर प्रदेशमध्ये एक लग्न तुटले ते फक्त एक रसगुल्ल्यावरून झालेल्या मारामारीमुळे.
उत्तर प्रदेशची राजधानी असणार्‍या लखनऊपासून 70 किलोमीटर असणार्‍या उनाओ जिल्ह्यातील कुर्मापूर येथे मुलीच्या गावी हा प्रकार घडला. मुलीच्या गावी लग्न असल्याने एक दिवस आधीच मुलाकडील वर्‍हाडी कुर्मापूरमध्ये दाखल झाले. दिवसभर लग्नाच्या आधीचे कार्यक्रम पार पडल्यानंतर रात्री कार्यक्रमानंतर जेवणाचा कार्यक्रम लगेच उरकून घेण्याची मागणी मुलीच्या वडिलांनी केली. जेवणामध्ये प्रत्येक वर्‍हाड्याला एकच रसगुल्ला देण्याचे आदेश कॅटर्सला दिले होते. मात्र, मुलाच्या चुलत भावाने स्वत:ला एकऐवजी दोन रसगुल्ले वाढून घेतल्याने वाद झाला.
 
शाब्दिक वादाचे रूपातंर हाणामारीत झाले आणि काही क्षणांतच जेवणाच्या काउंटवरील भांडी अस्ताव्यस्त अवस्थेत पडलेली होती. हा सर्व प्रकार बघू बाल्कनीमधून पाहात होती. त्यावेळी मुलांच्या नातेवाईकांनी मुलीच्या वडिलांना मारहाण केली असल्याचे लक्षात आल्याने मुलीनेच लग्न न करण्याचा निर्णय घेतला. मुलीच्या वडिलांनी वर्‍हाड्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.