गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. राष्ट्रीय
Written By
Last Modified: मंगळवार, 26 जून 2018 (15:10 IST)

काश्मीर मध्ये सरकार होते तेव्हा ३७० कलमा बद्दल का नाही बोलले - शिवसेना

शिवसेनेने भाजपा वर आज काश्मिर मुद्द्यावर जोरदार टीका केली आहे. इतकी वर्ष सत्तेत होते तेव्हा कधी ३७० कलम आठवले नाही. मात्र आता अचानक सत्ता सोडून तुम्हाला हे कलाम कसे आठवले आहे. पुन्हा का रान पेटवले जात आहे. असा सवाल शिवसेनेने भाजपाला सामना मधून विचारला आहे. लोकांना या बनवा बनवीचा वैताग आला असून भाजपाला खरे कसे  बोलावे हे सुचवले पाहिजे असे सामना मधून सांगितले आहे. पुन्हा पुन्हा तेच तेच मुद्दे आणि प्रश्न सांगून वातावरण निर्माण करण्यात येत आहे. हे थांबायला हेवे असे सुद्धा सामनाच्या लेखातून म्हटले आहे.
 
अग्रलेख पुढील प्रमाणे : 
जम्मू–कश्मीरमधील सत्तेच्या तीन वर्षांच्या काळात भाजपने ३७० कलमापासून ते एक देश एक निशाण या त्यांच्या मूळ अजेंडय़ास स्पर्शही केला नाही. पण सरकारमधून बाहेर पडताच या मुद्दय़ांवर बोलणे सुरू केले. हे प्रश्न सोडवण्यासाठीच तुम्हाला लोकांनी मतदान केले होते. मात्र सत्ता हाती येऊनही काही केले नाही व आता पुन्हा त्याच मुद्दय़ांवरून कश्मीरात वातावरण निर्माण केले जात आहे. म्हणजे पुन्हा तेच मुखवटे चढवले जात आहेत, पुन्हा तोच खेळ सुरू झाला आहे. लोकांना आता या बनवाबनवीचा वैताग आला आहे. कुणी तरी यांना खरे बोलण्याचे प्रशिक्षण द्या हो!
 
कश्मीरात भारतीय जनता पक्षाने मुखवटा उतरवला आहे व निवडणुकांचे नवे राजकारण सुरू केले आहे. मेहबुबा मुफ्ती यांच्या पीडीपी या पक्षाबरोबरचा सत्ता रोमान्स हा एकप्रकारे स्वैराचार होता. त्या स्वैराचारातून एक सरकार भाजपने जन्मास घातले व त्या सरकारचा गळा घोटून ‘आम्ही त्या पोराचे मायबाप नव्हंत’अशी काखा वर करणारी भूमिका भाजपने त्यांच्या परंपरेस जागून घेतली आहे. बाप पितृत्व नाकारू शकेल, पण आई मातृत्व नाकारू शकेल काय? मात्र भाजपने कश्मीरात ते नाकारले आहे. तीन वर्षे पीडीपीबरोबर गादी उबवल्यावर सरकार काम करीत नव्हते, त्यांचे आमचे जमत नव्हते, दहशतवाद वाढला आहे, लेह-लडाखच्या विकासाकडे सरकारने दुर्लक्ष केले व त्यामुळे सरकार पाडावे लागले, असे खुलासे आता भाजपकडून केले जात आहेत. खासकरून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांनी सर्व जबाबदारी पीडीपीवर टाकली आहे व कश्मीरचा सत्यानाश आणि तेथील हिंसाचारास भाजप जबाबदार नसल्याचे जाहीर केले आहे. म्हणजे पीडीपीसोबत ‘सत्ताशय्या’तीन वर्षे भोगली, पण जे फळ निघालं त्याचे पितृत्व किंवा जबाबदारी नाकारली आहे. मुळात पीडीपीबरोबर सरकार स्थापनेचा प्रस्ताव व धावाधाव भाजपची होती. महाराष्ट्रात शिवसेनेस उपमुख्यमंत्रीपद देण्यास नकार देणाऱ्या भाजपने जम्मू-कश्मीरात उपमुख्यमंत्रीपदासह विकासासंदर्भात अनेक महत्त्वाची खाती पटकावली होती.