गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: सोमवार, 11 जानेवारी 2021 (08:11 IST)

'हा' निर्णय सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे : बाळा नांदगावकर

मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी राज ठाकरेंच्या सुरक्षाव्यवस्थेत घट करण्याच्या निर्णयावर जोरदार टीका केली आहे. राज ठाकरेंच्या जीवाला देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून ते पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका आहे. त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे, अशी टीका बाळा नांदगावकर यांनी केली आहे.
 
सदरच्या निर्णयावर बाळा नांदगावकर यांनी फेसबूकवर पोस्ट लिहून सविस्तर प्रतिक्रिया दिली आहे. त्यात ते लिहितात की, राज्य सरकारने विरोधी पक्षातील नेत्यांच्या सुरक्षेत कपात केली. त्यात राज ठाकरेंचेही नाव आले. सरकार कोणाचेही असो वास्तवाचे भान ठेवून असे निर्णय घ्यायला हवेत. राज ठाकरेंच्या रोखठोक स्वभावामुळे अनेक हितशत्रू साहेबांबद्दल वैर बाळगून आहेत, परंतु साहेबांनी कधी अशा हितशत्रूंची तमा बाळगली नाही. साहेबांच्या एका आवाजावर अनेक सामान्य लोकांना संरक्षण देणारे हजारो महाराष्ट्र सैनिक या राज्यात आहेत.
 
बाळा नांदगावकर पुढे म्हणतात की, सरकार दरबारी जी कामे होत नाहीत किंवा ज्या विषयांना मतपेटी साठी टाळले जाते असे अनेक विषय राज ठाकरेंच्या हस्तक्षेपाने निकालात निघतात. राज ठाकरेंच्या जीवाला आपल्या देशातील विघ्नसंतोषी लोकांपासून तसेच पाकिस्तानी दहशतवाद्यांपर्यंत धोका असल्याचे आपण जाणूनच आहोत. तरी त्यांची सुरक्षा वाढविण्याऐवजी कमी करण्याचा घेतलेला निर्णय हा सरकारचे "खुजेपण" ठळकपणे दाखविणारा आहे. चीड या गोष्टीची येते की यात ज्यांना नव्याने सुरक्षा देण्याचा अथवा ज्यांची सुरक्षा वाढविण्याचा निर्णय घेतला आहे या यादीतील काही नावे बघितल्यास एकच प्रश्न उपस्थित होतो ते म्हणजे सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? सरकारने ज्या नवीन लोकांना सुरक्षा देण्याचे तसेच सुरक्षा वाढविण्याचे ठरविले त्यापेक्षा तोच पैसा आरोग्य व्यवस्था विकासासाठी वापरला असता तर अतिशय चीड आणणारी भंडारा जिल्ह्यातील 10 बाळांचा जीव घेणारी घटना टाळता आली असती, असा टोलाही बाळा नांदगावकर यांनी लगावला.