शनिवार, 20 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Updated : बुधवार, 21 मार्च 2018 (17:22 IST)

भाजपच्या सरकारला स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कार्याचा विसर

ज्या भाजपला स्व. गोपीनाथ मुंडे यांनी सामान्य लोकांपर्यंत नेण्याचे काम केले, त्याच भाजप व शिवसेनेच्या सरकारला आता त्यांच्या कार्याचा विसर पडला आहे, अशी टीका विधान परिषद विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे  यांनी केली.मागील तीन वर्षांच्या अधिवेशनाच्या कालावधीत सभागृहात वेगवेगळ्या आयुधांच्या माध्यमातून मी औरंगाबाद येथे स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मारकाला अद्याप निधी उपलब्ध का करून दिला नाही, याबाबत विचारणा केली. मात्र सरकारने याबाबत अजूनही उत्तर दिलेले नाही, असा आरोप मुंडे यांनी केला. या वर्षीच्या अर्थसंकल्पात आणि राज्यपालांच्या अभिभाषणात स्व. मुंडे यांच्या स्मारकाचा उल्लेख नव्हता. याचाच अर्थ या सरकारला स्व. मुंडे यांचा विसर पडला आहे, असेही ते म्हणाले.मराठवाडा विद्यापीठात गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने एक अध्यासन विभाग सुरू केला. उद्घाटनाच्या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या विभागाला १५० कोटी अनुदानाची घोषणा केली, मात्र त्या अध्यासनाला एकही रूपयाचे सहकार्य अद्याप करण्यात आलेले नाही, याबाबत मुंडे यांनी खंत व्यक्त केली.याशिवाय, या सरकारने परळीत २०१४ साली स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने उसतोड कामगार महामंडळाची स्थापना केल्याची घोषणा केली, पण या महामंडळालाही अजूनपर्यंत अनुदानाची तरतूद केली गेलेली नाही, हे देखील त्यांनी निदर्शनास आणून दिले.