शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 29 जुलै 2017 (11:32 IST)

जून २०१७ ला थकबाकीदार असलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज सरसकट माफ करा - आ. अमरसिंह पंडित

कोणतेही निकष, अटी, शर्ती न ठेवता जून २०१७ वर ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत असेल अशा सर्व कर्जदार शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफ करा, ऑनलाईन अर्जाची भानगड ठेवू नका, शेतकऱ्यांच्या सातबाऱ्यावरून दीड लाखांचा बोजा कमी करून सातबारा कोरा करा. हे सरकार शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेत आहे असे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वाटू द्या, असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस आ. अमरसिंह पंडित यांनी आजसभागृहात केले. विधान परिषद नियम २६० अन्वये प्रस्तावावर ते बोलत होते.

यावेळी बोलताना आ.अमरसिंह पंडित म्हणाले की कृषीमूल्य आयोग केवळ नावाला ठेवू नका. पाशा पटेल यांच्या कृषीविषयक सल्ल्यांचे अनुकरण करण्याची गरज आहे. एक्सपोर्ट आणि इम्पोर्टची पॉलिसी राज्यात उत्पादित होणाऱ्या पिकांच्या आणि फळांच्या प्रमाणावर ठरवली गेली पाहिजे असेही त्यांनी सभागृहात सांगितले.

कर्जमाफीबाबत बोलताना आ. पंडित म्हणाले की सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीत मोठी तफावत आहे. शासनाने कर्जमाफीची आकडेवारी स्वतः तपासून घेतली पाहिजे. ही कर्जमाफी शेतकऱ्यांची एेतिहासिक फसवणूक करणारी आहे.