1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By

कोल्हापूर, सांगलीतल्या पावसाचा मुंबईला फटका, दूध पुरवठा बंद

कोल्हापूर आणि सांगलीत पावसाने थैमान मांडला असून जनजीवन पुर्णपणे विस्कळीत झालं आहे. सांगलीत महापुराने  २००५च्या सर्वोच्च पातळीचा रेकॉर्ड मोडला आहे. तर आयर्विन पुलाजवळ ५५ फूट पाणी पातळीची नोंद झाली आहे. वाळवा तालुक्यातील बिचूद, रेठरे हरणाक्ष, बोरगाव, ताकारी, वाळवा, भिलवडी, औदुंबर येथील हजारो नागरिकांचे स्थलांतर करण्यात आलं आहे. कृष्णा आणि वारणा नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी वाहतुकीला फटका बसला असून मुंबई-पुणे-बंगळुरु महामार्गावरील वाहतुकही बंद पडली आहे.
 
कोल्हापूर आणि सांगलीमधील पुराचा फटका आता मुंबईकरांना बसणार आहे. गुरुवारी अर्थात आज  मुंबईकरांना दूध मिळणार नाही. मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कोल्हापूर आणि सांगलीमधून दुधाचा एकही टँकर नवी मुंबईत दाखल झालेला नाही. येथूनच हे दूध मुंबईभर पुरवलं जातं. कोल्हापूर-सांगलीमधून मुंबईत दर दिवशी १३ लाख लीटर दूध दाखल होतं. पण पुरामुळे वाहतुकीला फटका बसला असून कोल्हापुरातील दूध उत्पादन कंपन्यांनी दुधाचे संकलन थांबवलं आहे. त्यामुळे मुंबईत दूध येणार नाही.