1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: गुरूवार, 25 जानेवारी 2024 (09:02 IST)

पुणे-मुंबई द्रुतगती महामार्ग राहणार बंद, एपीएमसी मार्केट दोन दिवस राहणार बंद

मनोज जरांगे यांचा मोर्चा रात्री राष्ट्रीय महामार्ग 48 ला लागून असलेल्या वाकसाई गावात मुक्कामाला असणार आहे. त्यानंतर हा मोर्चा उद्या गुरुवारी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून नवी मुंबईत दाखल होईल. या मोर्चामध्ये लाखोंच्या संख्येने मराठा बांधव असल्याने नवी मुंबईत उद्या मोठी गर्दी होईल. त्याचमुळे उद्या आणि शक्रवारी कृषी उत्पन्न बाजार समिती म्हणजेच एपीएमसी मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव पी. एल. खंडागळे यांच्याकडून ही माहिती देण्यात आली आहे. 25 तारखेला मराठा आंदोलकांसाठी तर 26 जानेवारीला सार्वजनिक सुट्टी असल्याने मार्केट बंद राहणार आहे. एपीएमसी मार्केट बंद ठेऊन मराठा आंदोलकांना राहण्यासाठी जागा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती देखील सचिव खंडागळे यांच्याकडून देण्यात आली आहे.
 
मुंबईच्या दिशेने निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चामध्ये लाखो मराठा आंदोलक सहभागी झालेले आहेत. हा मोर्चा आता पुण्यात दाखल झाला आहे. तर उद्या गुरुवारी हा मोर्चा पुण्याहून निघून मुंबईत येणार आहे. ज्यासाठी उद्या पुण्याहून मुंबईच्या दिशेने येणारी वाहतूक बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गुरुवारी सकाळी लोणावळा येथून मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरून पुढे वाशीला जाणार आहे. त्यामुळे मुंबई-पुणे वाहिनीवरील साखळी क्रमांक किमी 54/400, पुणे-मुंबई वाहिनीवर साखळी क्रमांक किमी 53/000,किमी 50/000, किमी 48/00, खंडाळा उतारावर किमी 46/200 खंडाळा बोगदा येथील दुभाजक कट लोखंडी वा सिमेंटचे बॅरीगेट्स लावून तात्पुरते बंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.