शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. महाराष्ट्र माझा
Written By
Last Modified: शनिवार, 12 नोव्हेंबर 2016 (10:41 IST)

जनतेचा 'सर्जिकल स्ट्राइक' भारी पडेल

मोदी सरकारच्या ५०० आणि १०००च्या नोटा बदलण्याच्या निर्णयावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला आहे. काळा पैसा बाहेर यायला हवा यात दुमत नाही, मात्र केंद्र सरकारने घेतलेला अचानक नोटा बदलण्याचा निर्णय चुकीचा असून यामुळे सामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे. काळ्या पैशावर 'सर्जिकल स्ट्राइक' करणाऱ्यांविरुद्ध एक दिवस सर्वसामान्य जनता जो 'सर्जिकल स्ट्राइक' करेल तो सरकारला भारी पडेला, अशा शब्दांत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीकेची झोड उठवली आहे.
 
मोदी सरकारच्या नोटा बदलण्याच्या निर्णयाबाबत उद्धव ठाकरे यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत सरकारच्या या निर्णयावर जाहीर नाराजी व्यक्त केली. केंद्र सरकारने देशातील काळा पैसा बाहेर काढण्यासाठी नोटा बंद करून 'सर्जिकल स्ट्राइक' केला असे म्हटले जाते. मात्र, केंद्र सरकार स्वीस बँकेवर 'सर्जिकल स्ट्राइक' कधी करणार, असा सवाल उपस्थित करत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या नोटा बंद करण्याच्या हेतूवर अप्रत्यक्षपणे शंका उपस्थित केली आहे. 
 
जनतेला रस्त्यावर आणून मोदी जपानला 
या निर्णयामुळे नेत्यांना नव्हे तर सर्वसामान्य जनतेला त्रास होत आहे. जनतेला रस्त्यावर आणून मोदी जपानला गेले अशी टीका शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली आहे.