गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Modified: मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020 (12:33 IST)

धनियाच्या पदरी दोष पडतो

कुठल्याही प्रकारची आधुनिक सामग्री उपलब्ध नसताना देखील आकाशाला गवसणी घालण्याच्या आपल्या जबरदस्त इच्छाशक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. डोंगर-दर्‍यांच्या कडेकपार्‍यात दौडणार्‍या सामान्य मावळ्यांच्या मनामनात हिंदवी स्वराज्य स्थापनेचीमशाल पेटवून अतिशय लहान वयात स्वराज्य स्थापनेची शपथ घेणार्‍या शिवरायांचे व्यक्तिमत्व हे असामान्यच होते. जनतेच्या मनामध्ये हिंदवी स्वराज्याची मंगल ज्योत त्यांनी प्रज्वलित केली. अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये लहानग्या शिवबाला स्वराज्य स्थापनेचे स्वप्न दाखवून त्याच्या मनगटामध्ये ती ताकद निर्माण करणारी जगद्‌जननी जिजाई आणि दिलेल्या स्वप्नाला वास्तवात आणणारे छत्रपती शिवाजी महाराज, ही दोनही व्यक्तिमत्वे शतकानुशतके आपल्याला प्रेरणादायी आहेत.
 
शिवरायांचे कल्याणकारी राजकारण व आध्यात्मिक अधिष्ठान लाभलेले सामाजिक व्यवस्थापन हे आज अनुकरणीय आहे. राज्यकारभार करणारा राजा कसा असावा, याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे छत्रपती शिवराय. शिवरायांचा समग्र इतिहास आज आपल्याकडे उपलब्ध आहे. आजच्या राजकारण्यांनी शिवरायांचा संपूर्ण राज्यकारभार अभ्यासणे गरजेचे आहे आणि त्यांचा आदर्श गिरवण्याची, मनामनात भरण्याची आवश्यकता आहे. पूर्वीच्या काळी राजा असूनदेखील लोकशाही पद्धतीने लोकांसाठीचे राज्य चालवणार्‍या शिवछत्रपतींना आताआपल्या हृदयात सामावून घेण्याची गरज आहे. राजासाठी जनता नसते तर जनतेसाठी राजा असतो. आपल्या राज्यातील सर्वसामान्य जनतेची रात्रंदिन काळजी वाहणारा, त्यांच्या सुख-सोयींसाठी दिवसरात्र एक करणारा एकमेवाद्वितीय राजा म्हणजे राजा शिवछत्रपती होय.
 
आज्ञापत्र म्हणजे छत्रपतींची आज्ञा सांगणारे राजपत्र. शिवरायांची राजनीती, युद्धनीती, गडकोटनीती, परराष्ट्रधोरण, पर्यावरणनीती अशा विषयांवरची आज्ञापत्रे अभ्यासल्यानंतर त्या आज्ञापत्रांचे मोल लक्षात येते आणि शिवाजी महाराजांच्या दूरदृष्टीचे आणि रयतेच्या कल्याणासाठीचे धोरण स्पष्ट होऊन जाते. पर्यावरण संवर्धनाच्या विषयातले त्यांचे आज्ञापत्र कालातीत आहे. महाराजांच्या सगळ्या आज्ञापत्रांचा आजच्या तरुणाईंनी अभ्यास करणे अत्यंत महत्त्वाचे आहे.
 
'स्वराज्यातील आंबे, फणस आदी करून हेही लांकडें आरमाराच्या प्रयोजनांची, परंतु त्यांस हात लावूं देऊं नये. काय म्हणोनी, की, हीं झाडे वर्षां दोन वर्षांनी होतात असे नाही... ' 
 
जिवंत म्हणजे पाना-फुला-फळांनी बहरलेल्या हिरव्यागार झाडांना न तोडण्याची आज्ञा महाराजांची आहे. बियांमधून अंकुरलेल्या त्या छोट्याशा रोपाला मोठं व्हायला अनेक वर्षे लागतात, याची जाणीव या आज्ञेमध्ये आहे. 'रयतांनी हीं झाडें लावून लेंकरांसारखी बहुत काळ जतन करून वाढविलीं. ही झाडें तोडिल्यावर त्यांचे दुःखास पारावर काय?...' रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू न देणारा हा जाणता राजा. एखादे झाड तोडल्यानंतर आपल्या पोटच्या बाळाप्रमाणे सांभाळलेल्या त्या रयतेला किती दुःख होईल याचा विचार करणारा संवेदनशील असा हा रयतेचा राजा..... छत्रपती शिवराय!
 
याच आज्ञापत्रातून जीवनाचे सार समजावून सांगणार्‍या पुढील ओळी....
'एकास दुःख देऊन जे कार्य करीन म्हणेल तें कार्य करणारा सहित स्वल्पकाळाचें बुडोन नाहीसेंच होते किंबहुना धनियाचे पदरीं प्रजा पीडण्याचा दोष पडतो...' आपल्यापासून कोणालाही कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये याची काळजी आपण सार्‍यांनी घेतली पाहिजे. हाच मोठा संदेश शिवरायांच्या या आज्ञापत्रातून आपल्याला कायम मिळत राहणार आहे. इतरांना दुःख न देणे म्हणजेच 'पर्यावरणपूरकता' होय.
 
याच आज्ञापत्रातले शिवरायांचे 'या वृक्षांच्या अभावी हानीही होते...' हे वाक्य वृक्षारोपण आणि वृक्षसंवर्धनाच्या चळवळीला अधिक बळकट करणारे आहे.
 
अरविंद म्हेत्र