गुरूवार, 28 मार्च 2024
  1. धर्म
  2. सण-उत्सव
  3. शिवजयंती
Written By
Last Updated : सोमवार, 19 फेब्रुवारी 2018 (08:39 IST)

शिवचरित्रातून प्रेरणा घेऊ या

निश्चाचा महामेरू। बहुत जनांसी आधारू। अखंड स्थितीचा निर्धारू। श्रीमंत योगी।। या भूमंडळीचे ठायी। धर्मरक्षी ऐसा नाही। महाराष्ट्र धर्म   राहिला काही। तुम्हा कारणे ।। कित्येक दृष्ट संहारिले। कित्येकासी धाक सुटले। कित्येकासी आश्रय जाले। शिवकल्याण राजा।।’ या समर्थ रामदास स्वामींच्या पंक्ती आठवल्या की छत्रपती शिवाजी महाराजांच्या महान कर्तृत्वाचा आलेख डोळ्यासमोर हिमालयासारखा उभा राहिल्या शिवाय राहत नाही. या जाणत्या राजांबद्दल लिहावं, बोलावं आणि वाचावं तेवढं थोडच आहे. आयुष्यभर लिहीत वाचित आणि बोलत राहिलं तरी छत्रपतींच्या कार्याची महती सांगून पूर्ण होणार नाही. इतका अद्वितीय हा विषय आणि हा राजा महान आहे.
 
इ.स. पूर्व 200 ते 1271 पर्यंतचा महाराष्ट्र हा वैभवशाली होता. महाराष्ट्राची गृहलक्ष्मी सुखात नांदत होती. अशातच इ.स. 1313 मध्ये   अल्लाउद्दीन खिलजीच्या देवगिरीवरील आक्रमणाने महाराष्ट्रावर प्रलयाची पहिली लाट उसळली. इ.स. 1313 ते इ.स. 1630 पर्यंत अनेक सुलतानी राजवटींनी महाराष्ट्र खिळखिळा झाला. परिणामी रयत त्रासून मेटाकुटीला आली. अन्याय, अत्याचार, अंदाधुंदीचे धुके महाराष्ट्रभर पसरलेले होते. अशा प्रतिकूल परिस्थितीत 19 फेब्रुवारी 1630 रोजी शिवनेरी गडावर शिवजन्मोत्सवाने महाराष्ट्रात सोनियाची पहाट झाली. अन्याय अत्याचाराचे संकटचक्र भेदण्यासाठी शिवर्सूदर्शनचक्र तमाम हिंदुस्थानने पाहिले. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म हा क्षण तमाम रयतेचा आधारस्तंभ ठरला. अनेक संताच्या प्रबोधनाने व राजमाता जिजाऊंच्या संस्काराने व बाल संवगडी मावळ्यांच्या जिगरबाज साथीने वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी छत्रपतींनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करून सह्याद्रीच्या उंच शिरावर स्वराज्याचे तोरण बांधले. अगदी शून्यातून स्वत:च्या ताकदीवर आणि धाडसाने स्वराज्य निर्माण करणारा हा जगाच्या पाठीवरील एकमेव असा पहिला छत्रपती म्हणून राजा शिवछत्रपतींचेच नाव अखिल विश्वाला घ्यावं लागतं. 
 
अठरापगड जातीधर्मांना स्वराज्याच्या एका छताखाली आणून अविरतपणे 30 वर्षे रयतेच्याच रक्षणासाठी व कल्याणासाठी तीव्र संघर्षाचा लढा दिला. एक करोड होनाचं, तीनशे पंचाऐंशी किल्ल्यांचे आणि छत्तीस सुभ्याचं हिंदवी स्वराज्य निर्माण करून खर्‍या अर्थाने हिंदुहृदसम्राट, युगपुरुष, स्त्रीरक्षणकर्ता, शिस्तप्रिय मुलकी  राज्यकर्ता, अविश्रांत उद्योगी, महत्त्वाकांक्षी चाणाक्ष जाणता राजा, गनिमी कावा आणि आरमार दलाचा युद्धसम्राट, निष्कलंक चारित्र्वान पुण्यवंत श्रीमान योगी, आदर्श राज्यकर्ता असा नावलौकिक छत्रपतींनी मिळवला. त्यांची ख्याती खुद्द छत्रपतींचा प्रतिस्पर्धी औरंगजेब बादशहानेच मान्य केली होती. तो एके ठिकाणी राजांबद्दल म्हणतो, ‘मी सतत एकोण-वीस वर्षे त्यांच्याशी    झुंजलो, परंतु माझी अधोगती झाली आणि शिवाजींची मात्र स्वराज्याची मात्र भरभराटच होत गेली.’ जगभरातील पाश्चिमात्य राष्ट्रांनीही छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्यास राजमान्यता दिली. ‘शिवाजी राजा जर आमच्या देशात जन्माला आला असता तर आम्हाला आमच्या मुलांना काल्पनिक, हरक्युलिस अथवा स्पाडरमॅन, सुपरमॅनच्या कथा सांगाव्या आणि शिकवाव्या लागल्या नसत्या अशी भावना या पाश्चात्यांनी व्यक्त केली आहे. रयतेच्या हितासाठी वतनदारीला आळा घालून वेतनशाहीचा पुरस्कार करून आदर्श लोकशाहीचा धडा जगाला दाखवून दिला. शेतकर्‍यांच्या शेतसारा माफ करून, शेतकर्‍यांना मदत करून शेतकर्‍यांचा कैवारी राजा म्हणून ख्याती मिळवली. आपल्या   कारकिर्दीत राजांनी बत्तीस धरणं बांधून ‘पाणी अडवा पाणी जिरवा’ ही संकल्पना सुमारे 375 वर्षापूर्वी रुजविली. शिवकालीन पाणी योजना, उत्कृष्ट नगररचना, भक्कम गड-किल्ल्यांची निर्मिती, दूरदृष्टीची आरमार दलनिर्मिती, दूरदृष्टी, अचूकज्ञान, हिंदवी स्वराज्यात एकूण तीनवेळा जमीन मोजणी करणारा शेतकर्‍यांच्या सातबार्‍याची निर्मिती करणारा न्यायप्रिय राजा अवघ्या राष्ट्राने पाहिला. स्त्रीधन रक्षण करून प्रसंगी कडक शिस्तीने वागणारा राजा म्हणून त्यांची कीर्ती सर्वत्र पसरली होती. एकदा सैनिकांनी लढाईत खजिन्याबरोबर अहमदशहाची पुत्रवधू हिला पालखीतून आणली होती. ती सौंदर्यवती पाहून शिवाजी महाराज म्हणाले होते, अशीच आमची आई सुंदर असती तर आम्हीही सुंदर झालो असतो. ती मला मातेसमान आहे. म्हणून त्यांनी तिला साडीचोळीची बिदागी देऊन परत सन्मानाने पाठविण्याची व्यवस्था केली. हा आदर्श आजच्या आपल्या तरुण पिढीने घेण्यासारखा आहे. परंतु दुर्दैवाने आज तसे घडताना दिसत नाही. 
 
आज निरपराध मुली व स्त्रिा दुष्कर्माच्या शिकार होता आहेत. त्यांचा खटला पुढे चालतच राहतो, असे राजांच्या स्वराज्यात घडले नाही. याच जिवंत उदाहरण म्हणजे राझांच्या पाटलाचे तोडलेले हातपाय. राजा असा कर्तव्य, कठोर, निधर्मी, न्यायनिष्ठ असला पाहिजे. अशा शासनकर्त्याच्या 16 जून 1674 ला राज्याभिषेक झाला. असा हा विश्व वंदनी राजा शिवछत्रपती स्वराज्यातील रयतेला, आया बहिणींना, मुला-बाळांना, गदी सर्वानाच लळा लावून 3 एप्रिल 1680 रोजी परलोकी गेला. 
 
वि. वि. चिपळूणकर नेहमी म्हणायचे प्रत्येकाने शिवाजी व्हायला पाहिजे. शिवाजी म्हणजे सर्वोच्चतेचं प्रमाण आहे. आपण प्रत्येकानं  स्वीकारलेले कार्य, कर्तव्य, निष्ठेने आणि प्रामाणिकपणे पार पाडणे म्हणजे शिवाजी होणं.
 
हरिशचंद्रा खेंदाड