अत्यंत कुशल ह्रदयरोगतज्ज्ञ डॉ. नीतू मांडके यांचे अकाली निधन झाले. तेही दुर्देवाने ह्रदयविकारानेच. उपनगरात चारशे खाटांचे रूग्णालय उभारण्याचा त्यांचा मानस होता. त्यांच्या पत्नीला त्यांचे हे स्वप्न पूर्ण करायचे होते. त्यावेळी मी माझे मित्र अनिल अंबानी यांना शब्द टाकला. मला सांगायला आनंद वाटतोय, की हे हॉस्पिटल आता जवळपास पूर्ण होत आले आहे आणि लवकरच त्यात कामही सुरू होईल.
श्रीमती मांडके यांचे हे स्वप्न माझ्यापर्यंत पोहोचविले ते आमचे फॅमिली डॉक्टर डॉ. बर्वे यांनी. होय, तेही महाराष्ट्रीयच आहेत. शिवाय माझ्या कुटुंबातील असल्यासारखेच आहेत. वैद्यकिय बाबतीत त्यांचा शब्द आमच्या कुटुंबासाठी अंतिम असतो.
असे असताना आम्ही महाराष्ट्राविषयी अनादर दाखवू?
माझ्या वडिलांचे साहित्य प्रादेशिक भाषेत पहिल्यांदा मराठीतच अनुवादीत झाले. विशेष म्हणजे ते राज्याच्या अभ्यासक्रमातही आहे. आजही वडिलांचे साहित्य विशेषतः त्यांचे आत्मचरित्र मराठीत अनुवादित करण्यासंदर्भात मराठी लेखकांकडून मला सातत्याने विचारणा होत असते. मी कॉपीराईटचा कोणताही विचार न करता त्याला परवानगी दिली आहे.
जया अनेक विधायक कामात सहभागी आहे, हे अनेकांना माहित नाही. हाजी अली येथील अपंगांसाठी काम करणार्या संस्थेशी ती संबंधित आहे. मुक व बधीर मुलांचे नाट्यप्रयोग आयोजित करण्यात तिने पुढाकार घेतला आहे. शिवाय या मुलांना मुंबईबाहेर प्रयोग करण्यासाठी मदतही आम्ही केली आहे. या अनेक कार्यक्रमांना मी उपस्थित राहिलो आहे. माझ्यासह माझ्या मुलांनी या कार्यक्रमाचा प्रसार व्हावा यासाठी आमचा आवाज दिला आहे.
बर्याच जणांना हे माहित नाही की जया युवक बिरादरी या स्वयंसेवी संस्थेशीही संबधित आहे. ही संस्था मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात विधायक काम करत असते. नैसर्गिक आपत्ती, रक्तपेढी, समाज सेवा यासह विविध क्षेत्रात ती काम करते. राज्य सरकारकडूनही या कामाचे कौतुक झाले आहे. विशेष उल्लेख करायचा झाला तर लातूरमध्ये झालेल्या भूकंपानंतरच्या पुनर्वसनाच्या कामाचा करावा लागेल. आम्ही या पुनर्वसन कार्याला आर्थिक मदत केली होती. एका गावाची तब्बल महिनाभराची जेवणाची तरतूद केली होती.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांच्या मतदारसंघाचा काही भाग तीव्र दुष्काळाचा सामना करतो आहे. युवक बिरादरीच्या कार्यकर्त्यांनी तेथे जाऊन दुष्काळग्रस्तांना मदत करावी यासाठीही आम्ही आर्थिक सहाय्य केले. याशिवायही आम्ही हिंदुजा आणि माहिम, ब्रीच कॅंडी या हॉस्पिटल्सना आणि अंधांसाठी व गरजूंसाठी काम करणार्या बर्याच संस्थांना मोठ्या प्रमाणात आर्थिक मदत करतो. पण त्याच्या तपशीलात जाणे शक्य नाही.
याशिवाय आम्ही अनेक मुलांच्या शिक्षणासाठी मदत करतो. प्रत्येक वर्षी मुंबईतील २ ते ३ मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी मदत केली जाते. तसेच आमचे जुने आणि न वापरलेले कपडे आम्ही 'होम' या संस्थेला दान देतो. त्यांच्यातर्फे ते गरीबांना वाटप केले जातात.
या सगळ्यांतून आमचा महाराष्ट्र व महाराष्ट्रीय लोकांबद्दल अनादर प्रकट होतो का?
हे सगळं मी अतिशय मानवी संवेदनेतून सांगतो आहे. यातून माझ्या कृत्याचे समर्थन करण्याचा कुठेही प्रयत्न नाही. पण आम्ही शांत आहोत याचा अर्थ आमच्यावर अपराधीत्वाचे लेबल लावले तरी चालेल असे करणेही योग्य ठरणार नाही.
आम्ही या देशाचे कायदे पाळणारे नागरिक आहोत. मी कधीही चुकीचे वागलो असेल तर ते मी मान्य केले आहे. मी दोषी ठरलो तर शिक्षेची जबाबदीरीही मी स्वीकारतो आहे. पण चुकीचा आरोप करून मला शिक्षा ठोठावता येणार नाही.
जयाची टिप्पणी मराठीविरोधी वाटत नाही. हे म्हणजे कोणतीही जबाबदारी टाळण्याचा प्रकार नाहीये. पण शब्द अशा पद्धतीने उच्चारले गेले की त्यातून त्याचा विपरीत अर्थ लोकांसमोर जावा. खरे तर ते अधिक राष्ट्रीय भावनेशी नाते सांगणारे आहेत. पण हल्ली सातत्याने राष्ट्रीय भावना ही मनाच्या कोतेपणामुळे छोटी होत गेली आहे.
(अमिताभ बच्चन यांच्या ब्लॉगवरील नोंदीचे संक्षिप्त भाषांतर)