आणखी किती स्फोट घडणार?
| |
या सर्व शहरात झालेले बॉम्बस्फोट साखळी होते आणि आता तर या बॉम्बस्फोटांचीही साखळीच तयार झाली आहे. दरवेळी प्रश्न पडतो आता कोणते शहर? याचा अर्थ देशातील कुठलेही शहर सुरक्षित राहिलेले नाही. जयपूरला लक्ष्य केल्यानंतर दोन--तीन महिन्यात बंगलोर, त्याच्या दुसर्याच दिवशी अहमदबाद, ते होत नाही तोवर सुरतमध्ये बॉम्ब सापडले. आता या ठिकाणच्या जखमा वाळत नाहीत, तोवर राजसत्ता असलेली दिल्लीच अतिरेक्यांनी हादरवली आहे.
या सर्व स्फोटांवेळी देशाचे गृहमंत्रीपद शिवराज पाटील यांच्याकडे आहे आणि हे स्फोट रोखण्यासाठी त्यांचे गृहखाते काहीही करू शकले नाही हे वास्तव आहे. 'कुठल्याही राज्यात बॉम्बस्फोट झाले की संबंधित राज्याला सूचना दिली होती.' 'आम्ही आता सर्व राज्यांचा समन्वय साधणारी गुप्तहेर यंत्रणा निर्माण करत आहोत.' अशी ठोकळेबाज विधाने पाटील करत असतात, आता थेट त्यांच्या नाकावर टिच्चून दहशतवाद्यांनी हे स्फोट राजधानीत घडवून आणले आहेत. आता पाटील यावर काय विधान करतील? कुठल्या शब्दांत ते आपली जबाबदारी नाही असे म्हणतील?
| |
दिल्लीत झालेल्या बॉम्बस्फोटांना तर फार वेगळा अर्थ आणि संदर्भ आहे. एक तर ती देशाची राजधानी आहेच. शिवाय देशाच्या प्रशासकीय सत्तेचे ते प्रमुख केंद्र आहे. त्यामुळे दिल्ली सतत सुरक्षेच्या गराड्यात असते. पोलिस, सुरक्षा दल या सगळ्यांची सुरक्षा भेदून दहशतवादी बॉम्बस्फोट घडवत असतील तर ही सगळी यंत्रणा काय करत होती, असा प्रश्न पडतो. याचा अर्थ दिल्लीत सुरक्षा यंत्रणेलाही चकवून बॉम्बस्फोट घडवून आणता येतात आणि देशाच्या राजधानीचेही जे संरक्षण करू शकत नाही, ते देशाचे काय करणार असा संदेशही त्यातून जातो. थोडक्यात भारताच्या सार्वभौमत्वाला दिलेले हे आव्हान आहे.
| |
दरवेळी बॉम्बस्फोट झाले की ठरावीक चित्र असते. पंतप्रधानांसह बडे नेते संबंधित ठिकाणी जाऊन भेट देतात. मृतांच्या नातेवाईंकांचे सांत्वन करतात. जखमींच्या प्रकृतीची चौकशी करतात. दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करू असे उच्चरवाने सांगतात. गृहमंत्री सुरक्षा यंत्रणा बळकट करू असे विधान करतात. मृतांच्या नातेवाईंकाना, जखमींना मदत जाहीर होते. आणि त्यानंतर जणू पुढच्या बॉम्बस्फोटांची वाट बघत सगळे काही पुन्हा एकदा शांत होते.
अखेर हे किती दिवस चालणार? देशाचे नागरिक कधी शांत जीवन जगणार? सुरक्षा यंत्रणा कधी बळकट होणार? दहशतवाद्यांच्या प्रत्येक हालचालींचा सुगावा कसा लागणार? अतिरक्यांचे जाळे भेदून त्यांना अटक कधी होणार? त्यांच्यावर खटले चालून हे जाळे उखडून कधी फेकणार? प्रत्येक बॉम्बस्फोटांनतर हे सगळे प्रश्न सामान्य माणसांना पडत आहेत. दुर्देवाने त्याची उत्तरे या देशाचे गृहमंत्री देऊ शकलेले नाहीत आणि ज्यांना उत्तरदायित्व नाही त्यांना पदावर रहाण्याचा तरी काय अधिकार आहे?
