फोनवरून विष उतरवणारे हेडसाहेब
|
मध्य प्रदेशातील इंदूरच्या रामबाग कॉलनीत.
तेथे पोहोचल्यानंतर फोनवरून विष उतरवणार्या महाशयांबद्दल चौकशी केली असता पारावरचा बन्सी नावाची व्यक्ती आम्हाला हेडसाहेबांकडे घेऊन गेली. हे हेडसाहेब म्हणजे यशवंत भागवत. पोलिस खात्यात ते हेड कॉन्स्टेबल पदावर आहेत. आणि गेल्या पंचवीस वर्षांपासून ते सापाचे विष उतरवण्याच्या विद्येत पारंगत आहेत. फोनवरून विष उतरवणे ही त्यांची स्पेशलिटी.
फोटो गॅलरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा
यासंदर्भात थेट भागवत यांनाच बोलते केले, तेव्हा अगदी चित्तचक्षुचमत्कारीक माहिती उलगडली. सुरवातीला ते रूग्ण समोर आल्यावरच त्याचे विष उतरवत होते. मात्र, नंतर त्यांनी मंत्रांमध्ये काही फेरबदल केले आणि फोनवरून विष उतरवता येणे त्यांना शक्य झाले. ही गोष्ट सगळीकडे पसरली.
|
मग भागवतांच्या फोनला उसंत मिळेना. विष उतरवायचे असल्यास भागवत रूग्णाला सुरवातीला त्याचे व त्याच्या आईचे नाव आणि पत्ता विचारतात. मग ते मंत्रोच्चार करून विष उतरविण्यास सुरवात करतात. जेव्हा त्यांना वाटते की विष पूर्णपणे उतरले तेव्हा ते रूग्णाला नारळ फोडण्यास सांगतात. यानंतर मिठाची चव घेण्यास सांगतात. ते खारट लागले तर समजायचे की विष उतरले.
भागवतांच्या या विद्येचा ज्यांच्यावर परीणाम झाला अशांचा शोध आम्ही सुरू केला आणि पोहोचलो सरमन गोयल यांच्यापर्यंत. पेशाने शिक्षक असलेल्या गोयल यांचा अशा गोष्टींवर अजिबात विश्वास नव्हता. एका सकाळी घर स्वच्छ करताना त्यांना साप चावला.
घाबरलेल्या या अवस्थेत त्यांचा पाय पुन्हा सापाच्या शेपटीवर पडला. त्याने त्यांच्या दुसर्या पायालाही चावा घेतला. तातडीचा इलाज म्हणून ते भागवतांकडे पोहचले. त्यांनी नेहमीच्या मंत्रशक्तीने त्यांचे विष उतरवले. मी आज ठणठणत दिसतोय, तो केवळ भागवतांमुळेच, गोयल कृतज्ञतेने सांगतात.
गोयल यांच्यासारख्या अनेकांचा भागवतांच्या विद्येवर विश्वास आहे. यमाच्या चित्रगुप्तासारखी भागवतांकडेही डायरी आहे. पण त्यात नाव व पत्ते आहेत, ते त्यांनी ज्यांचे जीव वाचवले त्या लोकांचे. आतापर्यंत तीन मोठ्या वह्या या नाव व पत्त्यांनी भरल्या आहेत. विशेष म्हणजे भागवत एवढे सगळे करण्यासाठी एकही पैसा घेत नाहीत. त्यांचे म्हणणे आहे, हे मी सर्व दवासाठी करतोय. या सगळ्याचा कर्ता करविता तो साई-राम आहे.
|
टेलिफोनवर सापाचे विष उतरवण्याच दावा करणे हे... यावर आपले मत नोंदवा
|
त्यांच्या या विद्येला मानणार्यांमध्ये सामांन्य लोकांबरोबरच पोलिस खात्यातील अधिकारीही आहेत. पोलिस अधीक्षक प्रदीपसिंह चौहान आपला अनुभव सांगताना म्हणाले, की माझ्या घरी व कार्यालयाच्या परिसरात नेहमीच साप दिसत. त्यामुळे लोकांमध्ये भीती निर्माण झाली होती. तेव्हा मला भागवत यांच्याबद्दल कोणीतरी सांगितले. त्यांनी केलेल्या पूजेनंतर आता साप दिसणे बंद झाले आहे.
| |
|
एका बाजूला भागवत यांच्या विद्येवर विश्वास ठेवणारे लोक आहेत, तर त्याचवेळी असे काहीह नसते. हे सारे थोतांड असल्याचे सांगणारे बुद्धिजीवीसु्द्धा आहेत. महाराजा यशवंतसिंह हॉस्पिटलमधील डॉ. अशोक वाजपेयी हे त्यापैकीच एक. ते म्हणाले, की आपल्या देशात ७० टक्के साप हे बिनविषारी असतात.
बर्याचशा लोकांचे मरण्याचे कारण साप चावल्याची भीती असते. भागवतांकडे येणार्या लोकांनाही अशाच प्रकारे बिनविषारी सापांनीच चावा घेतलेला असावा किंवा काटा टोचला तरी साप चावल्यासारखे भासू शकते. साप चावलेला असल्यास त्यावर इलाज करणे हाच उपाय आहे. मंत्र तंत्र नव्हे.
भागवत म्हणतात की मला झाडपाल्याचे ज्ञान आईकडून मिळाले. विष उतरवण्याची ही विद्या प्रसिद्ध तांत्रिक जेलर नूर खॉ साहेब यांनी शिकवली. नूर खॉं हे तंत्रविद्येतील बडे प्रस्थ आहे. मुस्लिम गुरू आणि हिंदू शिष्याची जोडी जमली आहे. कुराणचा शफा आणि दुर्गा सप्तशतीचे ज्ञान एकत्रित करून आपल्याला ज्ञानदान करण्यात आल्याचे भागवत सांगतात.
|
दुर्गाकवचाची सिद्धी आपण मिळविल्याचा त्यांचा दावा आहे. दुर्गा कवचमध्ये विविध आजारांचे इलाज दिले आहेत. जेलर नूर खॉ यांनी २५ वर्षांपूर्वी विष उतरविण्याची विद्या शिकवली होती. तेंव्हापासून आजपर्यंत या विद्येद्वारे ते फोनवरून विष उतरवत आहेत.
वाचा नवीन कथा प्रत्येक मंगळवारी....
