पूर्वजांच्या प्रेरणादायी स्मृतींसाठी सागर पूजन
- पूज्य पांडूरंगशास्त्री आठवले
|
हा उत्सव भारतीय व्यापार-उद्योग करणाऱ्या समाजाच्या समृद्ध वारशाचीही महती गातो. त्याकाळात फारशा सोयी नसतानासुद्धा समुद्रावर स्वार होऊनच भारतीय व्यापारी इजिप्त, ग्रीस, श्रीलंका, ब्रह्मदेश, चीन, जावा या देशात गेले. आपला व्यापार वाढविला. त्याचबरोबर कलाकौशल्ये, तत्वज्ञान, धर्म, देवदेवतांचा प्रचार केला. त्यामुळे हे लोक भारताचे सांस्कृतिक राजदूतच म्हटले पाहिजेत. अशा या आपल्या पूर्वजांच्या प्रेरणादायी स्मृतींना अभिवादन करण्यासाठी समुद्राला नाऱळ अर्पण केला जातो.
सागरे सर्व तीर्थानि..... नदीपेक्षा संगम आणि संगमापेक्षा सागर अधिक पवित्र आहे, असे ऋषी-मुनींनी म्हटले आहे. गीतेत तर स्थितप्रज्ञाची तुलना समुद्राशी केली आहे. नदीत ठिकठिकाणचा वेगवेगळ्या प्रकारचा कचरा मिसळून वाहत वाहत समुद्राला जाऊन मिळतो. पण त्या कचऱ्यामुळे समुद्रावर काहीही परिणाम होत नाही. त्याचप्रमाणे स्थितप्रज्ञाच्या आंतरिक शांती व वैचारीक स्थैर्यामुळे वेगवेगळ्या वाईट विचारांचा मनात प्रवेश होऊनही त्याच्यावर काहीही परिणाम होत नाही.
सर्व संपत्ती मिळाल्यानंतर सागर कधीच उन्मत्त होत नाही. गर्विष्ठ होत नाही. आपल्या मर्यादेचे उल्लंघन करीत नाही. चार पैसे हातात आल्यानंतर आपलं घराणं, समाज, राष्ट्र, धर्म आणि संस्कृतीची थट्टा उडविणाऱ्या यकश्चित मानवाला सागराकडून त्याची ही नम्रता शिकायला हवी. मित्राची कसोटी आपत्कालिन प्रसंगात लागते, शूराची कसोटी रणांगणावर होते, तशीच व्यापाऱ्याची कसोटी त्याच्याकडे किती संपत्ती आहे, यावर होते. आणि हे वैभव मिळवूनही तो जगापुढे विनम्र असतो, या संपत्तीला तो परमेश्वराचा प्रसाद समजतो, तो व्यापारी या परीक्षेत उत्तीर्ण होतो.
|
म्हणूनच वेदनिष्ठा व वेदरक्षणाच्या प्रतिज्ञेची आठवण करणारा, ध्येयाचे स्मरण करणारा, भावनिक आयुष्याला समृद्ध करणारा आणि संपत्ती इश्वराला अर्पण करण्याचा संदेश देणारी ही श्रावणी पौर्णिमा भारतीय जनमानसासाठी महत्त्वाचा उत्सव आहे.
