गुरूवार, 28 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: रविवार, 19 मे 2019 (19:29 IST)

Exit Poll: एक्झिट पोलचा अंदाज किती खरा, किती खोटा?

अखेर लोकसभा निवडणुकांचं शेवटच्या टप्प्यातील मतदान संपलं असून वेगवेगळ्या संस्था आता एक्झिट पोल मांडत आहेत. पण हे एक्झिट पोल अचूक असतात की फक्त माहितीवर आधारित अंदाज असतो?
 
एक्झिट पोलमधून काय समजतं?
 
बीबीसीनं 2014 ते 2018 या दरम्यान प्रसिद्ध झालेल्या एक्झिट पोलचा अभ्यास केला.
 
त्यातून असं लक्षात आलं की, एक्झिट पोलमुळे आपल्याला कोण जिंकणार याचा अंदाज येतो, पण कोणत्या पक्षाच्या किती जागा येतील, हे नेमकेपणे समजू शकत नाही.
 
याचं उदाहरण म्हणजे 2017च्या गुजरात निवडणुकीत भाजप जिंकेल असं भाकीत एक्झिट पोलनं केलं होतं.
 
C-Voterनं असं भाकीत केलं होतं की भाजप 111 जागा जिंकेल आणि काँग्रेसच्या 71 जागा येतील. टुडे'ज चाणक्यनं म्हटलं होतं की भाजपला 135 जागा मिळतील आणि काँग्रेसला 47 मिळतील.
 
65 टक्के जागा या भाजपला मिळतील असा अंदाज बहुतेक एजन्सीजनं बांधला होता. पण जर प्रत्यक्ष निकाल पाहिले तर भाजपच्या अंदाजापेक्षा 10 टक्के जागा कमी झाल्या आहेत. भाजपला या निवडणुकीत 99 जागा मिळाल्या होत्या.
 
'नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही'
 
एक्झिट पोलमधून विजेता पक्ष कोण याचा अंदाज बांधता येतो, पण कोणत्या पक्षाला नेमक्या किती जागा मिळतील हे सांगता येत नाही.
 
हा फरक कसं काय राहतो, याचं उत्तर Centre for the Study of Developing Societiesचे संचालक संजय कुमार देतात.
 
ते सांगतात, "एक्झिट पोलसाठी जो सर्व्हे केला जातो, त्यात कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील याचा अंदाज घेतला जातो आणि मग त्या मतांच्या टक्केवारीवरून त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, याचा आडाखा बांधला जातो."
 
उदाहरणार्थ, एखाद्या पक्षाला 25 टक्के मत मिळणार असेल तर त्या आधारावर त्या पक्षाच्या किती जागा निवडून येतील, हे ठरवलं जातं.
 
"पण कधीकधी एखाद्या पक्षाच्या मतांची टक्केवारी आणि निवडून आलेल्या जागांमध्ये फरक दिसून येतो. खरं तर मतांची टक्केवारी तेवढीच असते, मात्र संबंधित पक्षानं फार कमी फरकानं जागा जिंकलेली किंवा हरलेली असते. यालाच first-past-the-post असं म्हणतात," ते पुढे सांगतात.
 
राजकीय विश्लेषक सुहास पळशीकर यांच्या मते, "एखाद्या पक्षाच्या नेमक्या जागा किती येतील, हे एक्झिट पोल करणाऱ्यांच्या सँपलिंगवर अवलंबून असतं. आपल्याकडे संसदीय लोकशाही आहे. त्यामुळे कोण जिंकणार हे सांगता येत असलं, तरी नेमक्या जागा सांगता येतीलंच, असं नाहीये.
 
"यात काही चूक नाहीये. म्हणजे एखादा एक्झिट पोल व्यवस्थित करूनसुद्धा त्याच्यामध्ये जागा किती मिळतील, याबाबत अनिश्चितता असू शकते. ते नॅचरल आहे. अध्यक्षीय पद्धतीत, अध्यक्ष कोण निवडून येईल, असं फक्त सांगायचं असतं. तसं आपल्याकडे नाहिये. 543 मतदारसंघ असतात. त्याच्यामुळे संसदीय पद्धतीत सीट सांगणं कठीण असतं."
 
Psephologist आणि Cvoterचे संस्थापक यशवंत देशमुख मात्र वेगळा मुद्दा मांडतात.
 
ते सांगतात, "कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, हा एक्झिट पोलच्या सर्व्हेचा भाग नसतो. कोणत्या पक्षाला किती मतं मिळतील, एवढं सांगायचं काम फक्त एक्झिट पोल करत असतो."
 
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात?
एक्झिट पोलचे अंदाज किती खरे ठरतात, याचं उत्तर ज्येष्ठ पत्रकार प्रणय रॉय आणि दोराब सोपारीवाला यांच्या 'The Verdict…Decoding India's Election' या पुस्तकात मिळतं.
 
या पुस्तकात 1980 ते 2018दरम्यान झालेल्या 833 एक्झिट पोलचे अंदाज देण्यात आलेले आहेत.
 
त्यात ते लिहितात, "एक्झिट पोल खरे ठरण्याचा अंदाज 84 टक्के इतका आहे."
 
कसा करतात एक्झिट पोल?
संजय कुमार सांगतात, "कोणत्याही पोलसाठी अगोदर एक सॅंपल बनवलं जातं. ज्यामध्ये काही हजार माणसांचा समावेश असतो. ज्या राज्यात निवडणूक आहे त्या राज्यातलेच हे मतदार असतात आणि त्यांची संख्याही त्याच प्रमाणात असते, जेवढी राज्यात असते."
 
"यात ग्रामीण, शहरी, वेगवेगळे धर्म, जाती, लिंग आणि समुदायाच्या लोकांना त्याच प्रमाणत घोतलं जातं जेवढं त्यांचं त्या राज्यात प्रमाण असतं. या सर्वांशी चर्चा करून त्यांनी कुणाला मत दिलं किंवा देणार आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला जातो."
 
"या सर्व बाबींची काळजी घेतल्यास अंदाज बऱ्यापैकी खरे ठरतात. पण सॅंपलमधील प्रमाण चुकीचं असेल तर अंदाज उलटण्याची शक्यता असते."
 
पाश्चिमात्य देशांत एक्झिट आणि ओपिनियन पोलचे अंदाज खरे ठरतात. पण भारतात मात्र अंदाजांपेक्षा ते वेगळेही लागतात.
 
यावर ते सांगतात, "भारतात याबाबत अजून सुधारणा होण्याची गरज आहे. पण हे सुद्धा खरं आहे की, जेवढी विविधता भारतीय मतदारांमध्ये आढळून येते तेवढी पाश्चिमात्य देशातल्या मतदारांमध्ये आढळून येत नाही."
 
"तिथल्या लोकांच्या धर्म आणि जाती बरेचदा सारख्याच असतात. तसंच भारताच्या तुलनेत तिथं निवडणुका लढवणारे पक्षही कमी असतात. हीच कारणं आहेत ज्यामुळे तिथले एक्झिट पोल बरोबर ठरण्याची शक्यता जास्त असते."
 
एक्झिट पोल महत्त्वाचे का?
निकडणुकीचे निकाल सांगणं आणि प्रेक्षकांची उत्सुकता भागवणं इतकंच एक्झिट पोलचं काम नसतं.
 
यशवंत देशमुख यांच्या मते, "कोणता पक्ष पुढे आणि कोणता मागे, हे सांगणं एक्झिट पोलचं पहिलं काम असतं. दुसरं म्हणजे प्रत्यक्षात निकाल लागल्यानंतर तो निकाल एक्झिट पोलशी कम्पेअर केला जातो, यातून मग डेमोग्राफिक्स कळतं. म्हणजे महिलांनी कुणाला मत दिलं, शेतकरी किंवा तरुणांनी कुणाला मत दिलं.
 
"कारण निवडणूक आयोग कोण जिंकेल किंवा हारेल, एवढचं सांगतं, पण कुणी कुणाला मत दिलं, हे एक्झिट पोलच सांगू शकतात."

श्रीकांत बंगाळे