1. मराठी बातम्या
  2. महाराष्ट्र न्यूज
  3. बीबीसी मराठी बातम्या
Written By
Last Modified: बुधवार, 17 फेब्रुवारी 2021 (18:49 IST)

एम. जे अकबर अब्रुनुकसानी खटल्यात प्रिया रमाणी निर्दोष

ज्येष्ठ पत्रकार आणि माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी त्यांची एकेकाळची सहकारी प्रिया रमाणी यांच्याविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला होता. त्या खटल्यातून प्रिया रमाणी निर्दोष सुटल्या आहेत.
 
दिल्लीतील एक न्यायालय बुधवारी (17 फेब्रुवारी) माजी केंद्रीय मंत्री एम. जे. अकबर यांनी पत्रकार प्रिया रमाणींविरोधात दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात निर्णय दिला.
 
आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात आवाज उठवणे हा गुन्हा नाही. महिलेला 10 वर्षानंतरही तक्रार करण्याचा अधिकार आहे असं न्यायाधीशांनी सुनावणीत म्हटले.
 
अॅडिशनल चीफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट रवींद्र कुमार पांडे दोन्ही पक्षांच्या उपस्थितीत आपला निर्णय सुनावला.
 
10 फेब्रुवारीला दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर कोर्टानं 17 फेब्रुवारीपर्यंत निकाल राखून ठेवला होता.
व्होग मासिकातल्या लेखातील लिखाणाचं संपूर्ण वाचन केल्यानंतर हे लिखाण बदनामीकारक असल्याचं कोर्टाचं मत असलं तरी या लेखातल्या एका विशिष्ट भागावर याचिकाकर्त्यांनी घेतलेला आक्षेप कोर्ट फेटाळत आहे. त्यावेळी विशाखा मार्गदर्शकतत्त्वंही नव्हतं, असंही कोर्टाने आपल्या निकालात म्हटलेलं आहे. या प्रकरणात आपलं निरीक्षण नोंदवताना कोर्टाने म्हटलं, "या आरोपांप्रती आपल्या समाजात एकप्रकारचा स्टिगमा असतो. लैंगिक अत्याचार आणि छळाचा पीडितेवर काय परिणाम होत असेल, हे समाजाने लक्षात घेतलं पाहिजे. समाजात नावलौकिक असलेली व्यक्तीसुद्धा लैंगिक अत्याचार करू शकते. अनके दशकांनंतरही एखादी स्त्री आपलं गाऱ्हाणं मांडू शकते, तसा अधिकार तिला आहे."
"लैंगिक अत्याचारामुळे स्त्रीच्या प्रतिष्ठेला आणि तिच्या आत्मविश्वासालाच तडा जातो. एखाद्या व्यक्तीच्या आत्मसन्मानाच्या किंमतीवर एखाद्याची सामाजिक प्रतिष्ठा जपली जाऊ शकत नाही", असंही कोर्टाने म्हटलं आहे.
 
रमाणी यांच्या वकील रेबेका जॉन यांनी कोर्टाकडे मागणी केली होती, की त्यांच्या अशीलाला या प्रकरणी निर्दोष मुक्त करण्यात यावं, दुसरीकडे अकबर यांच्या वकील गीता लुथरा यांनी म्हटलं होतं की, रमाणी यांच्या आरोपांमुळे अकबर यांची प्रतिमा मलीन झाली आहे.
 
'मी टू' चळवळ सुरू झाल्यानंतर प्रिया रमाणी यांनी अकबर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले होते. त्यानंतर 17 ऑक्टोबर 2018 मध्ये अकबर यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता.
ते म्हणाले होते, "माझ्यावर झालेल्या आरोपांविरुद्ध मी कोर्टात वैयक्तिक पातळीवर लढण्याचा निर्णय घेतला आहे, त्यामुळे मी पदावर राहणंही योग्य नाही. त्यामुळे मी परराष्ट्र राज्यमंत्रिपदाचा राजीनामा देतो आहे. या देशाची सेवा करण्याची संधी दिल्याबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांचे आभार मानतो."
 
अकबर यांनी या प्रकरणी कोर्टात धाव घेत त्यांच्याविरोधात आरोप करणाऱ्या प्रिया रमाणी यांच्यावर अब्रुनुकसानीचा दावा दाखल केला होता.
नेमकं प्रकरण काय?
2018 साली बॉलिवुड अभिनेत्री तनुश्री दत्ता हिने बॉलिवूड अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर एका चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान छेडछाड करण्याचा आरोप केला होता.
 
त्यानंतर अनेक महिलांनी त्यांच्याबरोबर झालेल्या लैंगिक छळवणुकींच्या घटनांचा उल्लेख करण्यास सुरुवात केली.कामाच्या ठिकाणी होणाऱ्या लैंगिक छळवणुकीबाबत महिला आता समोर येऊ लागल्या.
याच साखळीमध्ये पुर्वाश्रमीचे पत्रकार आणि सध्या केंद्र सरकारमध्ये परराष्ट्र राज्यमंत्री असलेले एम. जे. अकबर यांचंही नाव आलं होतं.
 
अकबर यांनी द टेलिग्राफ आणि द एशियन एज या वृत्तपत्रांचे संपादक म्हणून काम केलं होतं. त्याच काळात त्यांच्यासोबत काम केलेल्या अनेक महिलांनी त्यांच्यावर लैंगिक छळवणुकीचे आरोप केले. यात अनेक तरूण मुलींचा सहभाग होता.
ज्येष्ठ पत्रकार प्रिया रमाणी व्होग या मासिकात लिहिलेला लेख रिट्वीट करत त्यांनी त्यात अकबर यांचा उल्लेख केला. त्या लेखात त्यांनी कामाच्या ठिकाणी झालेल्या लैंगिक छळाच्या पहिल्या अनुभवाबद्दल लिहिले होते.
 
एम.जे. अकबर कोण आहेत?
ज्येष्ठ पत्रकार एमजे अकबर 2014 लोकसभा निवडणुकांपुर्वी भारतीय जनता पक्षाचा भाग झाले.
 
2015 मध्ये एमजे अकबर झारखंड मतदारसंघातून राज्यसभेचे प्रतिनिधी म्हणून निवडून आले.
 
एकेकाळी राजीव गांधींचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे एमजे अकबर 1989 मध्ये बिहारच्या किशनगंजमधून लोकसभेवर निवडून आले होते.
 
राजीव गांधी पंतप्रधान असताना एमजे अकबर त्यांचे प्रवक्ते होते.
 
ते 1991 मध्ये ते पुन्हा निवडणुकीत उतरले. मात्र त्यावेळी ते जिंकून येऊ शकले नाहीत. त्यानंतर ते पुन्हा पत्रकारितेत परतले.
 
#MeToo काय आहे?
#MeToo ही लैंगिक छळवणुकीच्या विरोधातली एक मोहीम होती. या हॅशटॅगचा आधार घेत लैंगिक छळवणुकीला बळी पडलेले (विशेषत: कामाच्या ठिकाणी) लोक आपली व्यथा मांडल्या गेल्या
 
हॉलिवुड दिग्दर्शक हार्वी वाईनस्टीन यांच्यावर अनेक अभिनेत्रींनी लैंगिक छळवणुकीचा आरोप केल्यावर या अभियानाने जोर पकडला.
 
त्यात सामान्य लोकांसकट अनेक प्रसिद्ध लोकांची नावं समोर आली आहेत. वाईनस्टीन यांची कंपनी दिवाळखोरीत निघाली आणि त्यांना चौकशीला सामोरं जावं लागलं.