शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. मराठी बातम्या
  4. »
  5. फ्लॅशबॅक-26/11
Written By वेबदुनिया|
Last Modified: मुंबई , गुरूवार, 26 नोव्हेंबर 2009 (19:22 IST)

दहशतवाद्यांचे मृतदेह वर्षानंतरही शवागृहातच

मुंबईवर हल्ला करणारे क्रूरकर्मा कसाबचे नऊ सहकारी पोलिस कारवाईत मारले गेले असले तरी अद्यापही त्यांचे मृतदेह सरकारच्या ताब्यात आहेत. पाकिस्तान सरकार त्यांना पुढे घेण्यास न आल्याने हे मृतदेह मुंबईच्या शवागृहात गेल्या वर्षभरापासून बेवारस म्हणून पडले असून त्यांच्यावर सरकारचा कोट्यवधीचा खर्च होतो आहे.

जे जे हॉस्पिटलच्या शवागृहात हे मृतदेह असून पाकिस्तानातून त्यांचे नातेवाईक येण्याच्या प्रतिक्षेत येथील कर्मचारी आहेत. या दहशतवाद्यांचे नाव व पत्ता भारताने पाकिस्तानला कधीच कळविला आहे. पण पाकिस्तान या सगळ्यांना आपले नागरिक म्हणून मान्य करत नसल्याने त्यांचे मृतदेह ताब्यात घ्यायलाही तिकडून कोणी आलेले नाही.

या मृतदेहांवर रासायनिक लेप लावला आहे. तरीही ते सडून गेले असून त्यांना दफन करणेही जिकीरीचे ठरू शकेल. मुंबईतील मुस्लिम समुदायाच्या कबरस्तान व्यवस्थापनाने या अतिरेक्यांचे मृतदेह आपल्या कबरस्तानात दफन करण्यास सख्त विरोध दर्शविला आहे.

आता या मृतदेहांना फार काळ शवागृहात सुद्धा ठेवता येणार नाही. त्यामुळे येथील कर्मचारी सरकारकडे डोळे लावून बसले आहेत.

विशेष म्हणजे या मृत दहशतवाद्यांचे जतन करण्यात सरकारचे एका वर्षात कोट्यवधी रूपये खर्च झाले आहेत. जगात कुठेही अद्याप मृत दहशतवाद्यांना इतका काळ शवागृहात ठेवण्याचे दुसरे उदाहरण नाही.