शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. गणेशोत्सव
  4. »
  5. गणेश महिमा
Written By वेबदुनिया|

हरतालिका (भाद्रपद शुध्द तृतीया)

हरतालिका हे व्रत पार्वतीने शंकर आपल्याला पती म्हणून मिळावा यासाठी केले होते असे मानले जाते. तेव्हांपासून आपल्याला जोडीदार मनासारखा व चांगला मिळावा म्हणून कुमारिकांनी हे व्रत करावे असा प्रघात आहे आणि लग्नानंतर मनासारखा जोडीदार मिळाला म्हणून आणि जन्मोजन्मी असाच जोडीदार मिळावा म्हणून नंतरही स्त्रिया हे व्रत करतात. मंगळागौरीच्या पूजेप्रमाणेच हिरव्या बांगडया २, कंगवा, आरसा, कुंकू, करंडा इ. साहित्य आणून, शंकराची प्रतिमा म्हणून वाळूची पिंड करून पूजा करतात. सात प्रकारची प्रत्येकी सात सात पाने गोळा करून ती शंकराला वहातात. त्यापैकी मुख्य पान म्हणजे रूईचे व बेलाचे पान. ही दोन्ही पाने ह्या पूजेत आवश्यकच आहेत.

पूजा झाल्यावर हरतालिकेची आरती म्हणतात व कहाणी वाचतात. त्यादिवशी बायका कंदमुळाशिवाय काहीही खात नाहीत. दिवसभर पाणीसुध्दा पित नाहीत. रात्री बारा वाजता रूईच्या पानावर मध घालून चाटतात. दुसरे दिवशी आंघोळ करून हरतालिकेची आरती करून उपवास सोडतात. हरतालिकेच्या दिवशी बायका एकत्र येऊन रात्री बारा वाजेपर्यंत जागरण करतात खेळ, फुगडया, गाण्याच्या भेंडया खेळतात. या दिवशी स्त्रिया इतर स्त्रियांना सौभाग्यवाणे देतात. दुस-या दिवशी उत्तरपूजा करतात.