गुरूवार, 18 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 25 नोव्हेंबर 2020 (06:37 IST)

Tulashi Vivah Story: तुळशी विवाह कथा

कनक नावाच्या एका राजाला नवसाने एक मुलगी झाली. तिचे नाव किशोरी असे होते. किशोरीची पत्रिका बघून ज्योतिषाने सांगितले की या मुलीसोबत विवाह करणार्‍याच्या आणि तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवणार्‍याच्या अंगावर वीज पडून तो मरेल. हे एकूण राजाला धक्काच बसला. असे भविष्य कळल्यावर राजा दुखी राहू लागला. तेव्हा एका ब्राह्मणाने राजाला ह्या पासून वाचण्यासाठी एक उपाय सांगितला. 
 
ब्राह्मणाने किशोरीला दासशाक्षरी विष्णू मंत्राचा जप करायला व तुळशीची पूजा करायला सांगितले. तसेच कार्तिक शुद्ध नवमीला तिचा विष्णूशी विवाह लावावा असा उपाय सांगितला. राजाची मुलगी किशोरीही त्याच प्रमाणे करू लागली.
 
एकदा एका गंधयाने किशोरीला बघितले आणि तो किशोरीवर मोहित झाला. त्या गंधयाने स्त्री वेश घेतला आणि माळिनीच्या मदतीने तिच्याबरोबर महालात आला. 
 
माळीनने गंधयाला स्वत:ची मुलगी असल्याचे सांगितले आणि ती फुलाची रचना करण्यात तरबेज असल्याने देवासाठी फुलांच्या नाना प्रकारच्या रचना करून देत जाईल असे म्हटले. अशा प्रकारे गंधी स्त्री वेशात किशोरीकडे दासी बनून राहू लागला.
 
दुसरीकडे कांची नगरीतील कांची नामक राजाचा पुत्र मुकुंद हा देखील किशोरीवर मोहित झाला होता. मुकुंद सूर्याचा उपासक होता म्हणून एका रात्री सूर्याने त्याच्या स्वप्नात येऊन त्याला दृष्टांत दिला व सांगितले, किशोरीचा नाद सोडून दे तिच्याशी विवाह करणारा वीज पडून मरेल. यावर मुकुंद सूर्याला म्हणाला की तुझ्यासारख्या देवाला तिचे वैधव्य टाळता येईल तसेच किशोरी मला मिळाली नाही तर मी अन्न पाणी वर्ज करून मरून जाईल. तेव्हा सूर्याने किशोरीच्या वडिलांना दृष्टांत देऊन सांगितले की राजपुत्र मुकुंदाला तू आपली मुलगी दे. कार्तिक द्वादशीला लग्नाची तिथी ठरली.
 
हे कळल्यावर गंधया दुखी झाला. त्यांने किशोरीसमोर आपल्या प्रेमाची गोष्ट सांगण्याचे ठरविले आणि ‍तिच्या जवळ गेला. किशोरी लग्न मंडपात जाताना मेघगर्जनांसह विजा कडाडल्या. किशोरीही भांबावून बाहेर आली. तिला बघून गंधयाने तिचा हात धरला व त्याक्षणी गंधयाच्या डोक्यावर वीज कोसळली व त्याचा मृत्यू झाला. नंतर राजपुत्र मुकुंद यांच्याशी किशोरीचा विवाह संपन्न झाला. ब्राह्मणाने सांगितलेल्या व्रताच्या प्रभावाने किशोरीचे वैधव्य टळले होते.