शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. हिंदू
  3. हिंदू धर्माविषयी
Written By
Last Modified: बुधवार, 7 जानेवारी 2015 (16:25 IST)

श्रद्धा आणि भक्ती

श्रद्धाळूपणा हा आवश्क आहे. श्रद्धेविना धर्म होत नाही. सत्कर्म कळत नाही. त्याविना जीवनच रूक्ष बनते. श्रद्धाहीन व्यक्ती स्वत:साठी, इतरांसाठी, मानवतेसाठी, समाजासाठी कलंक आहे. पण तेथे केवळ श्रद्धेने काम चालत नाही. तेथे बुद्धीचे असणे पण गरजेचे आहे. बुद्धी विकसित नसेल तर तेथे माणूस फसला जातो. केवळ एकटी बुद्धी असेल तर तो व्यसनाधीन होतो. दोन्ही नाकपुडय़ा चालल्या तर आरोग्य  आहे. तद्वत् बुद्धी व श्रद्धा दोन्ही योग्य हवेत. हे खुद्द भगवंतानी गीतेत कथन केले आहे. 
 
बुद्धियोगाने उपासना करणारा सर्वच द्वंद्वातून मुक्त होतो. परिस्थितीतून पार होऊ शकतो. शेवटी मला प्राप्त करू शकतो असे गीते (18-17) मध्ये म्हटले आहे. ज्यांनी आजपर्यंत भगवंताचे प्रेमपूर्वक स्मरण केले त्यांना हा बुद्धियोग लाभलेला आहे. पुरातन काळापासून त्याचे दाखले मिळतात. बुद्धिउपासनेची रीत जाणून घेणे अगत्याचे ठरते. भगवद् ज्ञानयोगापर्यंत जाण्यासाठी श्रद्धा हवीच. या बुद्धियोगाबरोबरच समाधी सुद्धा पाहिजे. विचारही पाहिजेत. उत्साहही हवा. केवळ उत्साह असेलतर माणूस भ्रमित होतो. केवळ समाधी असेल तर तो आळशी बनतो. केवळ श्रद्धा असेल तर तो ठकविले जाण्याची शक्यता असते. केवळ बुद्धी असेल तर तो शुष्क बनतो. त्याकरिता जीवनात उत्साह, समाधी, श्रद्धा, बुद्धियोग आणि विचार या पाचही गोष्टी संतुलतेने असणे फार आवश्क आहे. या पाच बाबी जेथे जीवनात सुव्यवस्थित असतात तेथे जीवनाची सुफलता असते आणि चिन्मयतेचे विचार, आरोग्य, ज्ञान आणि प्रसन्नता आपल्या मुठीत येते. असे शास्त्र, धर्मग्रंथ आणि साधुसंतांचे सांगणे आहे.