शनिवार, 27 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. »
  3. सण-उत्सव
  4. »
  5. जन्माष्टमी
Written By वेबदुनिया|

श्रीकृष्ण अवतार

WD
पृथ्वीलोकावर राक्षस, असूरांचे साम्राज्य पसरून शोषण व अत्याचार वाढतात तेव्हा भगवान विष्णू अवतार घेऊन दुर्जनांचा नाश करतात. त्यांनी घेतलेल्या अनेक अवतारांपैकी श्रीकृष्णाचा अवतार विशेष महत्वपूर्ण आहे. यावेळी अधर्मामुळे धर्म भ्रष्ट झाला होता. धर्म संस्थापनेसाठीच भगवान विष्णू श्रीकृष्णाच्या अवतारात अवतरले होते. त्यांनी कर्म समजूनच सर्वे कार्य पार पाडली. कार्यसिद्धीसाठी साम-दंड- भेदाचा उपयोग करण्यास ते कचरले नाहीत. पृथ्वीला पापी लोकांपासून मुक्त करण्यासाठीच त्यांनी जन्म घेतला. उदिष्टपूर्तीसाठी त्यांनी परिस्थितीनुरूप निर्णय घेतले. कर्म व्यवस्‍थेस त्यांनी सर्वश्रेष्ठ मानले. कुरूक्षेत्रात युद्धभूमीवर त्यांनी अर्जुनास गीता सांगून कर्मज्ञान दिले. त्यांच्या कर्मतत्वज्ञानाने ओतप्रोत भरलेला भगवदगीता हा हिंदु धर्मातील प्रमुख ग्रंथ आहे.

श्रीकृष्ण अवताराचा उद्देश
दृष्ट, अविवेकी व अत्याचारी व्यक्तींमुळे पृथ्वीवरील सामान्य जन त्रस्त होते. त्यांना अत्याचाराच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी भगवान विष्णू यांनी कृष्णावतार घेतला. धर्म, यज्ञ, दया यावर राक्षसांनी त्यावेळी हल्ला चढविला होता. सगळीकडे पाप माजले होते. या संकटातून नैतिकता, सद्व्यवहार, चांगुलपणा, सत्याचे रक्षण करण्यासाठी समस्त देवगन भगवान विष्णूची आराधना करत होते. अवतार घेऊन पृथ्‍वीवरील पापाचा भार कमी करण्यासाठी भगवान विष्णू सक्षम होते. त्यांनीच आजपर्यंत अवतार घेऊन राक्षसांचा नाश केला होता.

श्रीकृष्णापासून सृष्टीस आरंभ
संपूर्ण विश्व शून्यमय होते. सजीवांची उत्पत्ती व्हायची होती. जीवन समजले जाणारे पाणीही नव्हते. संपूर्ण अवकाशात अंधःकाराचे साम्राज्य पसरले होते. यावेळी सर्वशक्तीमान परमेश्वराने मनात आराखडा रचून सृष्टीची निर्मिती केली. प्रथम रूप, रस, गंध, स्पर्श व शब्द हे पाच विषय प्रकटले. यानंतर भगवान श्रीकृष्णापासून नारायण अवतरले. त्यांचा वर्ण निळा होता. त्यांचे व्यक्तिमत्व तेजस्वी, पीतांबर धारण केलेले होते. त्यांना चार बाहू होते. चार हातात क्रमश: शंख, चक्र, गदा व पद्य सामावले होते. त्यांच्या मुखावर मंद हास्यछटा होती. रत्नजडीत अलंकार त्यांनी धारण केले होते. श्रीकृष्णासमोर उभे राहून नारायण परमेश्वराचे गुणगाण करत होते.

कंसाचे बुद्धी- परिवर्तन
गर्ग मुनींच्या आज्ञेनुसार वासुदेवाशी देवकीचा विवाह पार पडला. कंसाचे वासुदेवावर खूप प्रेम होते. बहिण देवकीवर तर त्याचा आपल्या प्राणापेक्षाही अधिक स्नेह होता. देवकीच्या रथाचे सारथ्यही त्यानेच केले होते. रथाने काही अंतर मागे टाकले असतानाच आकाशवाणी झाली, 'अरे मुर्खा! तुझ्या या लाडक्या बहिणीचा आठवा मुलगाच तुझ वध करेल.' आकाशवाणी ऐकून तो स्तब्ध झाला व तलवार उपसून देवकीचा वध करण्यासाठी सरसावला. देवकीचे प्राण वाचवण्यासाठी वासुदेवाने देवकीचे पुत्र जन्म घेताच ते कंसाकडे सोपविण्याचे वचन दिले. कंसाने वासुदेवावर विश्वास ठेवला. मात्र, वासुदेव व देवकीचे मन भितीने कापत होते. ते तसेच घरी पोहचले. कंसाने ते इतरत्र जाऊ नये म्हणून त्यांना बंदी बनवण्याचा आदेश दिला. पहिल्या पुत्राप्राप्तीनंतर वासुदेवाने त्यास कंसास सोपवले. कंसास दया आली, त्याने वासुदेवास फक्त आठवाच पुत्र सोपवण्यास सांगितले.

मात्र, नारदाने सातदा कुणीकडूनही मोजल्यास येणार अंक आठच असल्याने पहिला पुत्रसुद्धा आठवा होऊ शकतो असे सांगितले. त्यामुळे क्रोधीत होऊन कंसाने देवकी व वासुदेवाच्या पहिल्या पुत्राचा वध केला. त्यानंतर देवकीपासून झालेल्या सर्व पुत्रांना वासुदेवाने कंसास सोपवले. भगवान श्रीकृष्णाच्या जन्मावेळी दैवी चमत्कार घडून भगवान सुखरूप गोकुळात पोहचले व त्यांनी सृष्टीच्या, प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी कर्माचे रणशिंग फुंकले.