शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 महाराष्ट्र मतदारसंघ
Written By

सातारा लोकसभा निवडणूक 2019

मुख्य लढत : उदयनराजे भोसले (राष्ट्रवादी) विरुद्ध नरेंद्र पाटील (शिवसेना)
 
उदयनराजे भोसले हे सोळाव्या लोकसभा निवडणूकीत खासदार म्हणून निवडून आले. साताऱ्यामध्ये उदयनराजे भोसले यांचेच चालले असे म्हटले जाते. उदयनराजे हे महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांचे तेरावे वंशज आहेत. उच्चशिक्षण घेतलेल्या उदयनराजे भोसले यांनी १९९० मध्ये राजकारणाची वाट धरली. १९९१ मध्ये ते नगरसेवक म्हणून निवडूण आले. १९९६ साली त्यांनी लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली. पण त्यांचा पराभव झाला. त्यानंतर भाजपाच्या तिकीटावर विधानसभा निवडणूक जिंकून ते राज्यमंत्री झाले. १९९८-९९ च्या काळामध्ये ते राज्याचे महसूल राज्यमंत्री होते. भाजपला रामराम करत त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. पण काँग्रेसकडून तिकीट न मिळाल्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी प्रवेश केला. राष्ट्रवादीच्या तिकीटावर २००९ आणि २०१४ च्या लोकसभा निवडणुकित ते विजयी झाले. २०१८ मध्ये उदयनराजे भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले होते. मात्र आता आगामी लोकसभा निवडणुकीतही तेच राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार आहे.
 
नरेंद्र पाटील हे अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ अध्यक्ष आहेत. मराठा क्रांती मोर्चा, माथाडी कामगारांचे नेते अशी ओळख असून युतीच्या जागावाटपात हा मतदारसंघ शिवसेनेला सुटल्यामुळे नरेंद्र पाटील यांनी शिवसेनेची उमेदवारी घेतली. शिवसेनेत येण्यापूर्वी ते भाजपमध्ये होते.
 
लोकसभा निवडणुकीत यावेळी लोकसभेच्या 543 जागांमधून महाराष्ट्रात 48 जागांसाठी मतदान प्रक्रिया पूर्ण झाली. महाराष्ट्रात लोकसभेसाठी चार टप्प्यात मतदान झाले. महाराष्ट्रात पहिल्या टप्प्यातलं मतदान ११ एप्रिलला, दुसऱ्या टप्प्यातलं मतदान १८ एप्रिललला, तिसऱ्या टप्प्यातलं मतदान २३ एप्रिलला आणि चौथ्या टप्प्यातलं मतदान २९ एप्रिलला संपन्न झाले होते. चार टप्प्यात झालेल्या निवडणुकीत सरासरी 60.68 टक्के मतदान झाले. 2014 साली देशात 9 तर महाराष्ट्रात 3 टप्प्यांत मतदान झालं होतं. निवडुणकांचे निकाल 23 मे रोजी जाहीर केले जाणार आहे.
 
विशेष म्हणजे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना यांनी महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी युतीची घोषणा केली. लोकसभेला भाजप 25 आणि शिवसेना 23 मतदारसंघांमधून लढली. तर विधानसभेच्या निवडणुकीत दोन्ही पक्ष निम्म्या-निम्म्या जागा लढवणार आहेत अशी घोषणा करण्यात आली. 
 
इकडे काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्रमश: 26 आणि 22 मतदारसंघांमधून आपले उमेदवार उभे केले होते.