शुक्रवार, 19 एप्रिल 2024
  1. मराठी बातम्या
  2. लोकसभा निवडणूक 2019
  3. लोकसभा निवडणूक 2019 बातम्या
Written By
Last Modified: मंगळवार, 16 एप्रिल 2019 (17:26 IST)

भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत - छगन भुजबळ

श्रीगोंदे :- भाजपला पाच वर्षांत स्वत:चे उमेदवार तयार करता आले नाहीत, ते विकासावर काय बोलणार? सुजय विखेंना राष्ट्रवादीने उमेदवारी देण्याचे ठरवूनही ते भाजपमध्ये का गेले? असा सवाल माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी केला. राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांच्या प्रचार सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते. विखे घराण्याला सर्व पक्षांची चाचपणी करण्याचा इतिहास आहे, असा टोलाही भुजबळ यांनी लावला.चूक नसताना मला जेलमध्ये टाकले. 
 
मुख्यमंत्री म्हणतात, भुजबळ तुम्ही जामिनावर बाहेर आहात.मी आमदार, महापौर असताना आपण हाफचड्डीवर शाळेत जात होता. मग तुम्हाला विचारून भाषण करू का?आ. जगताप यांनी श्रीगोंद्याच्या भूमिपुत्राला संधी देण्याचे आवाहन केले. राहुल जगताप म्हणाले, ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांची सर्वात मोठी फसवणूक केली आहे.शेतीमालाला हमीभाव देतो, शेतकऱ्यांना कर्जमाफी देतो, असे त्यांनी जाहीर केले परंतु कर्जमाफी दिली नाही आणि हमीभावही दिला नाही. यामुळे देशातील शेतकरी आत्महत्या करीत आहेत. राजेंद्र नागवडे म्हणाले, मोदींनी १५ लाख देण्याची खोटी घोषणा केली. देशाच्या सुरक्षेचे राजकारण भाजपने केले. अशा सरकारला हद्दपार करण्याची वेळ आली आहे. घनश्याम शेलार म्हणाले, सुजय विखे दमबाजीची भाषा करतात. आजोबांसारखीच परिस्थिती त्यांचीही होईल.