शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मनोरंजन
  2. भटकंती
  3. माझा महाराष्ट्र
Written By

नयनरम्य ताम्हिणी घाट

सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये वसलेल्या पश्चिम घाटामध्ये असलेले निसर्गरम्य ठिकाण म्हणजे ताम्हिणी घाट. पावसाळ्यातील निसर्गसौंदर्य भरभरून अनुभवायचे असेल तर आवर्जून भेट द्यायला हवी ती ताम्हिणी घाटाला. पावसाळ्यात इथल्या टेकडय़ा कात टाकतात. 
 
रूक्ष करडा रंग टाकून हिरव्यागार शाली पांघरतात. इथे मुळशी धरणाचा नयनरम्य देखावाही बघायला मिळतो आणि या छोटय़ाशा वर्षासहलीला नदीतील साहसी खेळांची (रिव्हर राफ्टिंग) जोडही देता येते. ताम्हिणी घाटात जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्गाने कोलाडपर्यंत जावे लागते. कुंडलिका नदीवरील पूल ओलांडला की, डाव्या बाजूला मुळशी धरणावरून पुढे पुण्याला जाणारा रस्ता लागतो. कोलाड आणि मुळशी धरणाच्या मधल्या भागात हा ताम्हिणी घाट आहे. थोडय़ा चढावरून पुढे गेले की, एखाद्या स्वप्नांच्या दुनियेतच आल्यासारखे वाटते. लांबच लांब पसरलेले हिरवेगार मखमली गालिचे, ओथंबून खाली आलेले काळे ढग, खळाळणारे निर्झर आणि मधूनच डोकावणारे धबधबे पाहताना डोळ्यांचे पारणे फिटते. पावसाळ्यात तयार होणारे इथले पाण्याचे काही प्रवाह शांतपणे डोंगरावरून खाली येतात तर काही धबधबे डोंगरावरून अक्षरश: कोसळत खाली येतात. तिथून उसळून पुढे वाहणारे हे पाणी बघायला पर्यटक इथे गर्दी करतात. घाटातल्या वळणा वळणावर नयनरम्य, विहंगम देखावे जणू काही आपली वाटच पाहात असतात. 
 
पावसाळी धुक्यात जणू काही डोकी हरवलेल्या टेकडय़ा आकाशात उंच झेपावत आहेत, असे वाटते. टेकडय़ांच्या या भल्या-थोरल्या ¨भतीवर अलगद उतरणारे ढग वातावरण भारावून टाकतात. काळ्या ढगांभोवती चालणारा हा ऊन-पावसाचा खेळ जणू काही दिव्याची ज्योत थरथरावी असा भासतो. हा मनोहारी खेळ पाहताना आपण मंत्रमुग्ध होतो. ताम्हिणी घाट त्याच्या वळण वाटातून असा स्वर्गीय सुखाचा अनुभव देतो. पावसाळ्यामध्ये खूप धमाल, मज्जा, मस्ती करायची असेल तर तुम्ही ताम्हिणी घाट येथे एक दिवसाची पावसाळी सहल करू शकता. 
 
कसे जाल :- मुंबईपासून अंतर 140 किमी आहे. पुण्यापासून पौड रस्त्यापासून 93 किमी अंतरावर आहे. मुंबईकडून येताना मुंबई - पुणे महामार्गावर लोणावळा इथे बाहेर पडावे लागते. लोणावळ्यापासून ऑबी व्हाली रस्त्याने ताम्हिणीकडे जाता येते.
 
चारुशिला बोधे