शुक्रवार, 26 एप्रिल 2024
  1. वृत्त-जगत
  2. »
  3. कौल महाराष्ट्राचा
  4. »
  5. खबरबात
Written By वेबदुनिया|

मनसेच्या दणक्यात सेना-भाजपची लागली वाट

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या दणक्याने आघाडी सरकारचा फायदा झाला असून, शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची पुरती वाट लागल्याचे चित्र आहे. राज्यातील 288 विधानसभा जागांसाठी आज मतमोजणी सुरू झाली असून, यात मनसेमुळे सेनेला अनेक जागांवर फटका बसला आहे. मनसेच्या मुसंडीने राज्यात आघाडी सरकार स्थापन करण्याचा मार्ग मोकळा झाला असून, सेना- भाजपला पुन्हा एकदा विरोधी बाकांवर बसावे लागणार आहे.

मतमोजणी सुरू झाल्यानंतर आघाडीचेच सरकार येणार असल्याचे चित्र दिसत असून, मनसे 15 पेक्षा अधिक जागांवर आघाडीवर आहे. सेनेला मनसे फॅक्टरचा चांगलाच फटका बसल्याचे दिसत आहे. मुंबईत मराठी माणसाने आपला कैवारी म्हणून मनसेच्याच पारड्यात भरभरून मते टाकल्या्चे दिसते आहे. त्यामुळे मुंबईवर शिवसेनेचे असलेले दीर्घ वर्चस्व संपुष्टात येण्याची स्पष्ट चिन्हे आता दिसू लागली आहेत.

काही झाले तरी युतीला पाठिंबा देणार नसल्याचे मनसेने यापूर्वीच स्पष्ट केले असून, यामुळे आघाडी सरकार सत्तेवर येणार हे निश्चित मानले जात आहे.

मनसेचा फायदा झाल्याचे आता कॉग्रेस आणि आघाडीच्या नेत्यांनी मान्य केले आहे. मनसेच्या उमेदवारांनी मतं खाल्ल्याने अनेक जागांवर आघाडीच्या उमेदवारांचा फायदा झाल्याचे उप मुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी मान्य केले आहे. शरद पवारांनीही दिल्लीत अशाच प्रकारचे वक्तव्य केले आहे.