गुरूवार, 25 एप्रिल 2024
  1. धर्म
  2. श्रद्धा -अंधश्रद्धा
  3. श्रद्धा -अंधश्रद्धा लेख
Written By
Last Modified: शुक्रवार, 1 मे 2020 (16:21 IST)

रात्रीच्या वेळी नखे कापणे अशुभ का मानले जाते?, जाणून घ्या यामागील 3 कारणं

आपण लहानपणापासून घरात मोठ्यांच्या सूचना ऐकत असतो त्यापैकी एक म्हणजे रात्रीच्या वेळी नखे काढू नये. मोठे लोकं हे सांगत असताना त्यामागील कारणं स्पष्ट सांगत नसल्याने मुलांना हा प्रश्न पडतो की यात वाईट आहे तरी काय, याचा आणि अशुभतेचा काय संबंध? पण पूर्वीच्या काळात आणि आजच्या काळात खूप अंतर आहे. 
 
आधीच्या पिढी मध्ये आणि आजच्या नव्या पिढीच्या विचारांमध्ये देखील बरेच अंतर आहे. आजच्या काळातील लोकं हे मान्य करत नाही त्यांना प्रत्येक विचारांच्या मागील तर्क पाहिजेत. त्यांना जुन्या विचारांचा सहजासहजी विश्वास बसत नाही, आणि हे असले जुनाट विचारांना ते अमान्य करतात. तर चला मग जाणून घ्या की रात्रीच्या वेळी नखे काढू नये असे का म्हणत होते...
 
1 नख आपल्या बोटांवर एक मजबूत थर असते ज्याने आपल्या बोटांचे रक्षण होते. म्हणून नखे कापताना सावधगिरी बाळगली पाहिजे जेणे करून आपल्या बोटांना कसलीही इजा होऊ नये. पूर्वीच्या काळात वीज नसायची सर्वत्र अंधारच असायचा. अश्या वेळेस लोकं दिवसाढवळ्या आपली सर्व कामे सूर्याचा प्रकाशातच उरकून घ्यायचे. आणि नखे देखील सूर्याच्या प्रकाशातच कापायचे. जेणे करून कोणत्याही प्रकाराचे नुकसान होण्याची शक्यता नसायची. 
 
2  जुन्या काळात लोकांकडे नेलकटर नसायचे. पूर्वी लोकं नख सुरीने किंवा धारदार शस्त्राने कापत असे. वरील सांगितल्या प्रमाणे आधीच्या काळी वीज(दिवे) नसल्यामुळे अंधारात धारदार वस्तूंचा वापर केल्यामुळे इजा होण्याची शक्यता असायची. 
 
3 ज्यावेळी आपण नखे कापत असतो त्यावेळी नखे कोठेही जाऊन पडतात. कुठल्याही खाण्याच्या वस्तूंमध्ये किंवा डोळ्यांमध्ये जाऊ शकतात. हे हानीप्रद असल्यामुळे रात्रीच्या वेळेस नखे कापण्यास मनाही होती. अर्थात पूर्वी वीजपुरवठा नसल्याने ही रीत असावी पण तो काळ निघून गेल्यावर देखील लोकांचा अंधविश्वास दूर झालेला नाही.