1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By

लातूर येथे देशातील सेंद्रिय साखर निर्मितीचा पहिला मान विलास कारखान्याला

देशभरात विषमुक्त सेद्रिंय पदार्थाची मागणी वाढत आहे, त्यामुळे सेंद्रिय शेतीला प्राधान्य देऊन कारखान्याच्या माध्यमातून सध्या पाचसे हेक्टर सेंद्रिय ऊसची लागवड केली आहे. पुढील हंगामात दिड हजार हेक्टरवर वाढवण्याचे उदिष्ट आहे. या हंगामात देशातील सेंद्रिय साखर निर्मितीचा पहिला मान लातूर येथील विलास कारखान्याला मिळणार असल्याचे कारखान्याचे संस्थापक चेअरमन माजी राज्यमंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. विलास सहकारी साखर कारखान्याच्या १८ व्या गळीत हंगाम प्रसंगी बोलत होते. 
 
यावेळी लातूर ग्रामीणचे आमदार त्रिंबक भिसे, लातूर ग्रामीणचे माजी आमदार वैजनाथ शिंदे, रेणा कारखान्याचे चेअरमन आबासाहेब पाटील, कृउबा सभापती लालितभाई शाह, जेष्ठ नेते विक्रम हिप्परकर, पंचायत समिति सभापती शितल फुटाणे, मांजरा कारखान्याचे माजी चेअरमन धनंजय देशमुख, माजी जि.प. अध्यक्ष दत्तात्रय बनसोडे, माजी जि.प. अध्यक्ष संतोष देशमुख, नाथसिंह देशमुख, कृउबा उपसभापती मनोज पाटील, रेणापुर तालुकाध्यक्ष लालासहेब चव्हाण, रेणा कारखान्याचे संचालक प्रविण पाटील, बँकेचे व्हा.चेअरमन चंद्रकांत देवकते, शाहुराज पवार, दौलतराव कदम, संभाजी वायाळ, जगदीश बावणे आदी उपस्थित होते. 
 
आमदार अमित विलासराव देशमुख पुढे म्हणाले की, मांजरा परिवारातील साखर कारखाने अद्यावत करण्यासाठी नवनवीन तंत्रज्ञानाचा वापर करण्याचा प्रयत्न सुरू आहे. जगातील विविध देशात होणार तंत्रज्ञानाच्या वापराच्या माध्यमातून कारखान्याला आंतरराष्ट्रीय दर्जा प्राप्त करायचा प्रयत्न आहे. बदलत्या काळानुसार हार्वेस्टिंग यंत्राव्दारे ऊस तोडणी करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.