1. मराठी बातम्या
  2. अर्थजगत
  3. वाणिज्य वृत्त
Written By
Last Modified: नवी दिल्ली , सोमवार, 17 सप्टेंबर 2018 (13:52 IST)

रामदेवबाबांनी काढला भाजपचा चिमटा

रुपयाच्या घसरणीमुळे अर्थजगतात चिंतेचे वातावरण असतानाच योगगुरु रामदेवबाबा यांनी केंद्र सरकारला चिमटे काढले आहेत. रुपयाची ही अवस्था बघून आता लाजेलाही लाज वाटत असेल, अशा शब्दात त्यांनी मोदी सरकारला फटकारले.
 
राजकीय पक्ष सांगतात देशाला पुढे न्यायचे आहे. पण देशाचा आर्थिक विकासदर वाढला नाही तर देश कसा पुढे जाईल? रुपयाची अब्रू चव्हाट्यावर आली आहे, असे रामदेवबाबा म्हणाले.
 
देशाची अर्थव्यवस्था भक्कम असायला हवी. रुपयाची स्थिती सुधारण्यासाठी पावले उचलावी लागतील, असेही त्यांनी म्हटले आहे. विजय मल्ल्या प्रकरणात अनेकजण आरोपीच्या पिंजर्‍यात येतील. मल्ल्या राज्यसभेचा खासदार होता, त्यावेळी त्याला कोणी पाठिंबा दिला. नुकसान होत असूनही मल्ल्याला कोणी मदत केली, याचा तपास केला पाहिजे. विद्यमान सरकारनेही याबाबत थोडे सावध राहायला हवे होते, असे त्यांनी नमूद केले. मल्ल्या हा एक राक्षस होता आणि तो देश सोडून पळाला. देशात सध्या आर्थिक अराजकता निर्माण झाल्यासारखी स्थिती आहे. काही बेईमान लोकामुंळे चांगल्या लोकांनाही व्यवसाय करता येत नाही, असे त्यांनी सांगितले.