शुक्रवार, 29 मार्च 2024
  1. मराठी बातम्या
  2. आज-काल
  3. मंथन
Written By
Last Modified: मंगळवार, 8 ऑक्टोबर 2019 (17:01 IST)

दसर्‍याच्या आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

युग प्रवर्तक प्रभू श्रीरामचंद्रांनी रावणाचा वध केला. महात्मा गांधींच्या भाषेत सांगायचं झालं तर सत्याचा असत्यावर विजय झाला. प्रभू श्रीरामचंद्र आणि भगवान श्रीकृष्ण म्हणजे भारताचा आत्मा. आपल्या घरी बाळ जन्माला आलं तर आपण बालकृष्ण म्हणतो आणि एखादी गोष्ट बिघडली तर आपण म्हणतो की या गोष्टीत काही राम उरला नाही. कृष्ण आणि रामाचा इतका आपल्या मनावर प्रभाव निर्माण झालेला आहे. राम-कृष्ण होऊन गेले नाही असे अनेक लोक म्हणतात. पण मी तरी या दोन पात्रांना ऐतिहासिक पात्रे मानतो. भक्ती संपदायाचा उदय झाल्यापासून राम-कृष्णांच्या भोवती आपण चमत्काराचं कुंपण घातलं त्यापासून ही दोन पात्रे आपल्याला अतीमानवीय वाटू लागली. पण हे चमत्काराचं कुंपण जर काढून टाकलं तर हे दोन महामावन आपल्यासारखेच भासतात. पण त्यांचं कर्तृत्व असमान्य होत. शिवराय, बाजीराव, आंबेडकर, सावरकर ह्यांचं कर्तृत्व आपण तपासून पाहिलं तर तेही असामान्यच होते.
 

रावण हा चांगला होता, त्याला गर्व झाला होता वगैरे धोतांड आहे. रावण हा अत्याचारीच होता हे वाल्मिकी रामायण वाचल्यावर कळतं. त्याला तुम्ही काल्पनिक पात्र म्हणा किंवा ऐतिहासिक राम रावणाचा अभ्यास करायचा असेल तर वाल्मिकी रामायण हा प्रमुख ग्रंथ आहे. तत्कालीन काही ग्रंथ असले तरी ते सहज उपलब्ध नाहीत. म्हणजे प्रत्येक राजाचा एक इतिहासकार असतो. रावणाच्या दरबारी सुद्धा असेल. पण कदाचित त्यांनी लिहिलेला इतिहास आज उपलब्ध नाही. म्हणून वाल्मिकी रचित रामायण हाच प्रमुख ग्रंथ होय. त्यानंतर लिहिलेल्या राम कथा ह्या विश्लेषण किंवा भक्तिमार्गाने लिहिल्या आहेत.
 

रामाने रावणाचा वध केला आणि सत्याचा विजय होतो हे वाक्य किंवा ही नीती अधोरेखित केली. रामाने जर ठरवलं असतं तर त्याने आपला भाऊ भरताला आदेश दिला असता, भरत सैन्य घेऊन धावत आला असता आणि रावणाला धडा शिकवला असता. रावणार्‍या सासरच्या लोकांनी म्हणजे मिथिला नरेशांनीही मदत केली असती. पण रामाने आपल्या नेतृत्व गुणांनुसार सुग्रीवला जिंकलं आणि वानर सेनेला घेऊन रावणाचा निःपात केला. हे विशेष आहे. नेता कसा असावा तर रामासारखा... आणि सेनापती (दास नव्हे) कसा असावा तर हनुमंतासारखा... आपल्या याच पूर्वजांना आपण देव मानतो...
 

त्यामुळे रावण दहन म्हणजे रावणाची आठवण काढून त्याला मारणे नव्हे तर रावण दहन म्हणजे सध्या असलेल्या सर्व रावणांना आव्हान असतं की भारतीयांमधला राम जर जागृत झाला तर तुम्हीही असेच भस्म होणार आहात. रावण दहन म्हणजे खपली काढून रडणे नव्हे तर मर्यादा पुरुषोत्तम ह्यांच्या पराक्रमाची ज्योत तेवत ठेवणे होय.
 

सावरकरांनी रत्नागिरीत अस्पृश्यतेचा पुतळा जाळला होता. तुम्ही आम्ही हिंदू... बंधू आहोत असं त्यांनी ठामपणे सांगितलं. अस्पृश्यतेच्या रावणाचा वध करण्यासाठी अनेक समाजसुधारक पुढे आले. त्यात सावरकर आणि आंबेडकर हे दोन प्रमुख महापुरुष होय. सावरकरांनी रत्नागिरीसारख्या सनातनी विभागात प्रचंड क्रांती केली. डिस्प्रेस्ड क्लास मिशनचे शिंदे म्हणाले की "माझं ऊर्वरित आयुष्य सावरकांना मिळावं". इतकी क्रांती त्यांनी केली होती. बाबासाहेबांनीही क्रांती केली. आपण हिंदू सहिष्णू आहोत असं म्हणतो पण आपण परकीय लोकांसाठी सहिष्णू राहिलो. पण स्वतःच्या बंधूंना अस्पृश्य ठरवलं. आपण गाईला माता मानून तिची पूजा केली पण आपल्यासारख्याच माणसाला आपण देवळातही येऊ दिलं नाही. हे आपल्या पूर्वजांनी केलेलं पाप आहे. बाबासाहेब आणि त्यांच्या सर्व टीमने संविधानाची निर्मिती करुन अस्पृश्यता संपवली. व्यवहारात संपायला काही काळ गेला असेल. पण सुरुवात तर झाली... त्याचप्रामणे बाबासाहेबांनी याच दिवशी धम्म स्वीकारुन खूप अस्पृश्यतेचा रावण जाळून टाकला. आपल्या अनेक हिंदू बांधवांना बेडीतून मुक्त झाल्यासारखं वाटलं. हिंदूंमधल्याच एका पंथाचा स्वीकार करुन बाबासाहेबांनी आपल्या बांधावांना मुक्ती तर दिलीच त्याचबरोबर हिंदू धर्माचेही नुकसान होऊ दिले नाही. धम्मक्रांती अतिशय महत्वाची होती... आजच्या काळात सुखवस्तूपने जगणार्‍या लोकांना त्या क्रांतीचा अंदाज येणार नाही. पण ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्राने रावणाचा वध केला, ज्याप्रकारे सावरकरांनी अस्पृश्यतेचा पुतळा जाळला, त्याप्रमाणे बाबासाहेबांनी आपल्यातल्या मनात असलेल्या अस्पृश्यतेचा वध केला होता.
 

आजचा दिवस खास आहे. आज भारतीय वायू सेना दिवस सुद्धा आहे. एअर स्ट्राईक आपल्या सर्वांनाच आठवतेय. अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे आजपासून ९४ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा जन्म झाला होता. नागपूरमध्ये २५ स्वयंसेवक संचालन करत होते. आज ती संघटना भव्य दिव्य झालीय. अनेकांनी त्या संघटनेला बदनाम करण्याचा लकहो प्रयत्न केले. पण सर्व कायदेशीर बाबी आणि सामाजिक बाबी पार करत आज या संघटनेचे विराट स्वरुप आपल्या समोर आहे. लोकशाही मार्गाने चालणारी ही एकमेव "भव्य" संघटना आहे.
 

म्हणून आजचा दिवस खास आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी केलेला रावण वध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या आपल्या मनातल्या अस्पृष्यतेच्या रावणाचा वध आपल्याला चिरकाल प्रेरणा देत राहिल...

तुम्हाला सर्वांना दसर्‍याच्या आणि धम्म चक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..

जय हिंद, जय श्रीराम, जय भीम...

लेखक: जयेश शत्रुघ्न मेस्त्री